उत्तर प्रदेशातील हाथरस येथील रतिभानपूरमध्ये सत्संगाच्या वेळी चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीमुळे ६० जणांचा मृत्यू झाला असून अनेक महिला आणि लहान मुलं जखमी झाली आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने या अपघाताची गंभीर दखल घेतली असून जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेण्याचे तसेच घटनास्थळी मदतकार्याला गती देण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. एडीजी आग्रा आणि आयुक्त अलीगड यांच्या नेतृत्वाखाली घटनेमागच्या कारणांचा तपास करण्याच्या सूचना मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री योगींच्या सूचनेनंतर सरकारचे दोन वरिष्ठ मंत्री आणि मुख्य सचिवांसोबत घटनास्थळी रवाना झाले आहेत.
६० जणांचा मृत्यू-
हाथरसच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी या घटनेची पुष्टी केली असून "हाथरसमध्ये एका भोलेबाबांच्या सत्संगादरम्यान ही घटना घडली. जिल्हा प्रशासनाकडून जखमींना हॉस्पिटलमध्ये आणलं जात आहे. त्यामुळं निश्चित आकडा सांगता येणार नाही. परंतु डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ५०-६० जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेच्या तपासासाठी उच्चस्तरीय कमिटीची स्थापना करण्यात आली आहे."
मुख्यमंत्र्यांकडून घटनेच्या चौकशीचे आदेश-
या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री कार्यालयाने जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तातडीने जखमींना योग्य उपचारासाठी रुग्णालयात नेण्याचे आणि घटनास्थळी मदतकार्याला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. एडीजी आग्रा आणि आयुक्त अलीगड यांच्या नेतृत्वाखाली घटनेच्या कारणांचा तपास करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
सरकारचे दोन मंत्री घटनास्थळी रवाना-
त्याचवेळी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर सरकारचे दोन वरिष्ठ मंत्री लक्ष्मी नारायण, संदीप सिंग, मुख्य सचिव आणि डीजीपी यांच्यासह घटनास्थळी रवाना झाले आहेत.
सत्संगानंतर चेंगराचेंगरी झाली : प्रत्यक्षदर्शी
एका महिलेने सांगितले की, आम्ही दर्शनासाठी आलो होतो. खूप गर्दी होती. चेंगराचेंगरी झाली तेव्हा मी आणि माझा मुलगाही गर्दीच्या खाली पडलो. जखमी आईसोबत रुग्णालयात पोहोचलेल्या एका मुलीने सांगितले की, सत्संग संपल्यानंतर चेंगराचेंगरी झाली. आम्ही शेतातून निघालो होतो, तेवढ्यात अचानक जमावाने ढकलायला सुरुवात केली, त्यामुळे बरेच लोक खाली चिरडले गेले. आमच्यासोबत आणखी एक व्यक्ती आली होती. त्याचा मृत्यू झाला आहे.