संबलपूर : ओदिशातील संबलपूर येथे चक्क एका विमानतळाच्या धावपट्टीवर परीक्षा घेण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. होमगार्डच्या अवघ्या १८७ पदांसाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी तब्बल ८,००० उमेदवारांनी अर्ज केला होता. यानंतर ही परीक्षा विमानतळाच्या धावपट्टीवर घेण्यात आली. विशेष म्हणजे, या पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता केवळ इयत्ता पाचवी उत्तीर्ण अशी होती. असे असतानाही पदवीधरांसह हजारो तरुणांनी हजेरी लावली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही भरती १६ डिसेंबर रोजी संबलपूर पोलिसांनी जिल्ह्यातील २४ पोलीस ठाण्यासाठी आयोजित केली होती आणि ती शहराच्या जवळच असलेल्या जमादारपाली धावपट्टीवर घेण्यात आली. अर्जदारांची संख्या प्रचंड होती आणि त्यामुळे लॉजिस्टिकचा प्रश्न होता. यातून मार्ग काढण्यासाठी लेखी परीक्षा धावपट्टीच्या रनवेवर घेण्याचा निर्णय घेण्यात आला, ज्यामुळे सर्व उमेदवारांना कोणत्याही अडचणीशिवाय परीक्षा देता येईल, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
येथे उमेदवारांनी ९० मिनिटांमध्ये ५० गुणांची लेखी परीक्षा दोन टप्प्यात दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, जे लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना शारीरिक क्षमता चाचणीसाठी बोलावण्यात येईल. एका अधिकाऱ्याने सांगितले की, होमगार्ड पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांपैकी बहुतेक उमेदवार पदवीधर होते, तर काहींकडे तांत्रिक आणि व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदव्याही होत्या. ओदिशातील होमगार्ड भरती ही कंत्राटी तत्त्वावर केली जाते आणि राज्य सरकार त्यांना दिवसाला ६३९ रुपये भत्ता देते.
ड्रोनचाही वापर
इतर जिल्ह्यांमध्येही अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या जवळपास सारखीच असते, मात्र, तेथे लेखी परीक्षेचे आयोजन करण्यासाठी स्टेडियम किंवा मोठ्या मैदानाचा वापर केला जातो. पण संबलपूरमध्ये थेट विमानतळाची धावपट्टी निवडण्यात आली, ज्यामुळे ही भरती प्रक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. ओदिशा येथील परीक्षा सुरळीत पार पाडता यावी यासाठी पुरेसे अधिकारी तैनात करण्यात आले होते, तसेच उमेदवारांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनही वापरण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.