वॉशिंग्टन : अमेरिकेने भारतात पाठवण्यासाठी आणखी ४८७ बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांची ओळख पटवली असून, या भारतीयांना मायदेशी पाठवले जाणार आहे, असे भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी सांगितले.
यापूर्वी ४ फेब्रुवारी रोजी १०४ बेकायदेशीर अवैध भारतीयांना मायदेशी पाठवले होते. भारतीयांना मायदेशी पाठवताना कोणतेही गैरवर्तन होऊ नये, याची यापुढे काळजी घेतली जाईल, असे विक्रम मिस्री यांनी सांगितले. जर असे कोणतेही प्रकरण आमच्या लक्षात आले तर आम्ही ते अमेरिकेसमोर उपस्थित करू, असे ते म्हणाले.
४ फेब्रुवारी रोजी भारतीयांना मायदेशी पाठवताना त्यांना बेड्या ठोकण्याचा मुद्दा अमेरिकन अधिकाऱ्यांसमोर उपस्थित करण्यात आल्याचे मिस्री म्हणाले. ते म्हणाले की, निष्पाप लोकांना दिशाभूल करून बेकायदेशीरपणे अमेरिकेत पाठवणे हा कर्करोगासारखा आजार आहे. हे करणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे.
ट्रम्प यांच्याकडून चाबहार बंदराची सवलत मागे
इराणमधील चाबहार बंदराला दिलेली सवलत मागे घेण्याचे आदेश अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. यापूर्वी अश्रफ गनी सरकार असताना अमेरिकेने भारताला अफगाणिस्तानात माल पोहचवण्यासाठी चाबहार बंदराबाबत सवलत दिली होती. या बंदरात भारताने गुंतवणूक केली आहे. ट्रम्प यांच्या निर्णयाने भारताला फटका बसणार आहे. या बंदरामुळे मुंबई ते युरेशियातील अंतर कमी झाले आहे.