नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली असतानाच, पहिल्याच दिवशी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याने खळबळ उडवून दिली. भारताचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी सोमवारी रात्री प्रकृतीच्या कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात धनखड म्हणाले की, “आरोग्याला प्राधान्य देऊन आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करून मी संविधानाच्या कलम ६७(अ) नुसार भारताच्या उपराष्ट्रपतीपदाचा तत्काळ राजीनामा देत आहे. मी राष्ट्रपतींचे आभार मानतो, माझ्या कार्यकाळात त्यांनी मला दिलेला पाठिंबा आणि त्यांनी केलेले सहकार्य अभूतपूर्व होते. मी पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचेही मनापासून आभार मानतो. पंतप्रधानांनी दिलेला पाठिंबा अमूल्य होता, माझ्या कार्यकाळात मी खूप काही शिकलो आहे.’’
“संसदेच्या सर्व सदस्यांकडून मला मिळालेले प्रेम आणि विश्वास नेहमीच माझ्या आठवणीत राहील. देशाच्या महान लोकशाहीत उपराष्ट्रपती म्हणून मला अनेक अनुभव मिळाले, यासाठी मी मनापासून आभारी आहे. देशाच्या आर्थिक प्रगतीचा आणि अभूतपूर्व विकासाचा साक्षीदार होणे आणि त्यात सहभागी असणे ही समाधानाची बाब आहे. या परिवर्तनकारी युगात देशाची सेवा करणे माझ्यासाठी खास सन्मान आहे. हे पद सोडताना, भारताचा जागतिक पातळीवर झालेल्या उदयाचा आणि देशाच्या अभूतपूर्व कामगिरीचा मला अभिमान आहे. भारताचे भविष्य उज्ज्वल असेल, असा मला विश्वास आहे. मी मनापासून आदर आणि कृतज्ञता व्यक्त करतो,” असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
जगदीप धनखड यांनी २०२२ मध्ये देशाचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. ६ ऑगस्ट २०२२ रोजी झालेल्या उपराष्ट्रपती निवडणुकीत धनखड यांनी विरोधी उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला. एकूण ७२५ पैकी ५२८ मते धनखड यांना मिळाली होती, तर अल्वा यांना १८२ मते मिळाली होती.
जगदीप धनखड यांचा जन्म १८ मे १९५१ रोजी झुंझुनू जिल्ह्यातील एका साध्या शेतकरी कुटुंबात झाला आणि त्यांचे सुरुवातीचे शिक्षण गावातच झाले. त्यानंतर त्यांना चित्तौडगड येथील सैनिक स्कूलमध्ये दाखल करण्यात आले. धनखड यांनी राजस्थान विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी एलएलबीचे शिक्षण घेतले. जयपूरमध्ये राहत असताना त्यांनी वकिलीची प्रॅक्टिस सुरू केली.
७० वर्षीय जगदीप धनखड यांची ३० जुलै २०१९ रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बंगालचे २८ वे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली. ते १९८९ ते १९९१ पर्यंत राजस्थानातील झुंझुनू येथून लोकसभा खासदार होते. १९८९ ते १९९१ पर्यंत धनखड हे व्ही.पी. सिंह आणि चंद्रशेखर सरकारमध्ये केंद्रीय मंत्रीदेखील होते.