नवी दिल्ली : देशभरात तीव्र उष्णतेचा प्रकोप सुरूच असून २ डझन शहरांचे तापमान ४५ अंशांपेक्षा जास्त नोंदवले गेले. आठ राज्यांतील ३४ शहरांमध्ये सकाळी ९:३० वाजताच पारा ३८ ते ४२ अंशांपर्यंत जात आहे. यूपीमधील बांदा सलग तिसऱ्या दिवशी ४८ अंश तापमानासह देशातील सर्वात उष्ण ठिकाण बनले, तर वर्ध्यात पारा ४७.१अंशांवर गेला होता. या वर्षातील हे सर्वाधिक तापमान आहे.
हवामान विभागाने पुढील ३ दिवस महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश या ३ राज्यांत तीव्र उष्णतेच्या लाटेचा ‘रेड अलर्ट’ जारी केला. वर्ध्यात गेल्या ४ दिवसात उष्माघात व पाण्याविना ९ जण दगावले आहेत. दरम्यान, राज्यातील १५ शहरांचे तापमान ४० अंशांच्या पार होते. या शहरांमध्ये वर्धा ४७.१अंश, नागपूर ४६.६ अंश, अमरावती ४६.४अंश, चंद्रपूर ४६.२अंश, अकोला ४५.२ अंश, यवतमाळ ४५.२अंश, गोंदिया ४४.९ अंश, नांदेड ४३.० अंश, वाशिम ४२.६ अंश आदीचा समावेश आहे.