नवी दिल्ली: प. आशियातील संकट दीर्घकाळ सुरू राहिल्यास त्याचे प्रतिकूल परिणाम रुपयाच्या विनिमय दरावर होऊ शकतात तसेच पेट्रोलियम उत्पादने आणि खतांच्या किमती वाढल्याने महागाई वाढू शकते, असा इशारा केंद्रीय अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी दिला आहे.
अर्थ मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या फेब्रुवारीच्या ‘मासिक आर्थिक आढाव्यात’ म्हटले की, सुरक्षित गुंतवणुकीकडे भांडवलाचा कल वाढल्याने परदेशी भांडवल प्रवाह कमी होऊ शकतो आणि त्यामुळे रुपयावर दबाव येण्याची शक्यता आहे.
या संघर्षामुळे ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती सुमारे ९ टक्क्यांनी वाढून प्रति पिंप सुमारे ८० डॉलरपर्यंत पोहोचल्या आहेत, तर द्रवरूप नैसर्गिक वायू (एलएनजी) च्या किमती जवळपास ५० टक्क्यांनी वाढल्याचे अहवालात नमूद केले आहे.
भारताची कच्च्या तेलाच्या आयातीवर मोठी अवलंबित्व असले तरी देशाकडे पुरेसे परकीय चलनसाठे, कमी चालू खाते तूट (वित्त वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या सहामाहीत जीडीपीच्या ०.८ टक्के) आणि तुलनेने कमी महागाई दर असल्यामुळे वाढत्या जागतिक तेलकिमतींचा परिणाम कमी करण्याची क्षमता भारताकडे असल्याचे अहवालात म्हटले आहे. तथापि, संकट कायम राहिल्यास रुपयाच्या विनिमय दरावर आणि चालू खाते तुटीवर त्याचा ठोस परिणाम होऊ शकतो.