कोलकाता : पश्चिम बंगालचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी राज्याची विधानसभा बरखास्त केली आहे. विधानसभेची मुदत गुरुवारी रात्री १२ वाजता संपणार होती. दरम्यान, गुरुवारी संध्याकाळी राजभवनाने 'सर्वसामान्यांच्या माहितीसाठी' कालच जारी केलेले एक पत्र सार्वजनिक केले. ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्यास नकार दिल्याने निर्माण झालेला पेच त्यामुळे संपुष्टात येणार आहे
संविधानाच्या अनुच्छेद १७२ नुसार, विधानसभेचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर ती आपोआप बरखास्त होते आणि नवीन सरकार शपथ घेईपर्यंत मावळते मंत्रिमंडळ 'केअरटेकर' (काळजीवाहू) म्हणून कामकाज पाहू शकते.
दरम्यान भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे निकटवर्तीय चंद्रनाथ रथ यांची बुधवारी रात्री उशिरा गोळ्या घालून हत्या झाली असून यामुळे बंगालमधील भाजप व तृणमूल काँग्रेस यांच्यातील संघर्षाला नवे वळण लागले आहे. रथ यांची हत्या सराईत नेमबाजांनी किंवा शार्प शूटर्सनी केली असावी असा संशय आहे. पोलिसांनी बनावट नंबर प्लेट असलेली वाहने जप्त केली आहे.
भाजपने या घटनेवरून तृणमूलवर कडाडून हल्ला चढवला असून बंगालमधील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचा आरोप केला आहे. प्रदेशाध्यक्ष सामिक भट्टाचार्य म्हणाले, "निवडणूक आम्ही जिंकलो आहोत, तरीही आमचेच कार्यकर्ते मारले जात आहेत." केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याला 'रक्ताळलेले राजकीय संस्कृती' म्हटले आहे, तर चिराग पासवान यांनी अशा हिंसाचाराविरुद्धच जनतेने मतदान केल्याचे नमूद केले.
दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या हत्येशी पक्षाचा कोणताही संबंध नसून भाजप या घटनेचे राजकारण करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेस आणि माकप नेत्यांनीही या हत्येचा निषेध करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.