नवी मुंबई : भाजप आणि शिवसेनेने नवी मुंबईकरांना दिलेली आश्वासने पूर्ण न करता त्यांना हरताळ फासला असून या पक्षांकडून नवी मुंबईकरांची उघड फसवणूक झाली आहे, असा आरोप मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी केला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, प्रवीण म्हात्रे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रवीण म्हात्रे म्हणाले की, नवी मुंबईत एकही उमेदवार बिनविरोध निवडून गेलेला नाही, याचा आम्हाला अभिमान आहे. प्रभाग क्रमांक २४ मधील उमेदवारांच्या अर्जाची छाननी होत असताना हरकत घ्यायची संधी असूनही ती जाणूनबुजून घेऊ दिली नाही. तसेच प्रभाग क्रमांक १५ मधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार शत्रुघ्न पाटील यांचा अर्ज पूर्ण भरलेला असतानाही निवडणूक अधिकाऱ्यांनी मनमानीपणे तो बाद केला. गजानन काळे पुढे म्हणाले की, भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून विरोधी पक्षातील उमेदवार पळवून नेणे, गुंड पाठवून धमकावणे, पैशांचे आमिष दाखवणे असे प्रकार सुरू आहेत. परिणामी आम्हाला आमच्या उमेदवारांना लपवून ठेवावे लागले आहे. तसेच भाजप-शिवसेनेच्या अनेक नगरसेवकांचे नातेवाईक नवी मुंबई महानगरपालिकेत कंत्राटदार असतानाही त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे, जे नियमबाह्य आहे.
गजानन काळे म्हणाले की, गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांनी पायबूत सुविधा प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करणे यासह विविध घोषणा करून गेल्या अनेक वर्षांत निवडणुका जिंकल्या; मात्र त्यापैकी बहुतांश आश्वासने अद्याप पूर्ण झालेली नाहीत.