नवी मुंबई : मीटरप्रमाणे भाडे आकारण्याच्या वादातून नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) सहायक मोटार वाहन निरीक्षक तुषार कदम यांच्यावर रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदारांनी हल्ला केल्याची गंभीर घटना नेरूळमधील एल. पी. जंक्शन परिसरात सोमवारी सकाळी घडली. या प्रकरणी नेरूळ पोलिसांनी रिक्षाचालकासह पाच जणांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहायक मोटार वाहन निरीक्षक तुषार तानाजी कदम (३३) हे ७ सप्टेंबरला सकाळी सुमारे ५.४५ वाजता उलवे येथील घरी जाण्यासाठी नेरूळमधून रिक्षा करत होते. यावेळी संबंधित रिक्षाचालकाने मीटरप्रमाणे भाडे घेण्यास नकार देत कदम यांच्याकडे ३०० रुपयांची मागणी केली. कदम यांनी मीटरप्रमाणे भाडे देण्याचा आग्रह धरत आपले आरटीओ ओळखपत्र दाखविल्यानंतर रिक्षाचालकाने कदम याना शिवीगाळ करत धमकी दिली.
डोळ्याला, तोंडाला दुखापत
वाद वाढल्यानंतर रिक्षाचालकाने मोबाईलवरून आपल्या साथीदारांना बोलावून कदम यांना घेरून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात त्यांच्या डोळ्याला आणि तोंडाला दुखापत झाली असून झटापटीदरम्यान त्यांची सोन्याची साखळी गहाळ झाली. मारहाणीदरम्यान आरोपींनी कदम याना ठार मारण्याची तसेच ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.
आरोपींना पोलीस कोठडी
या घटनेनंतर कदम यांनी नेरुळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी रिक्षा क्रमांकाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. तसेच सोमवारी रात्री रिक्षाचालक नितीन कैलास सोनवणे (२७) याला प्रथम अटक केली. त्यानंतर पोलिसांनी त्याचे इतर साथीदार शुभम राजेंद्र नरवणे (२०), ओम राजेंद्र नरवणे (२४), अमित प्रफुल्ल सकपाळ (२३) आणि समुद्दीन मुलाणी (२३) यांना अटक केली. पाचही आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेवाळे यांनी दिली.