राजकीय

महायुती सरकार बरखास्त करा! काँग्रेस शिष्टमंडळाचे राज्यपालांना साकडे

राज्यातील जनता दुष्काळात होरपळून निघत असताना महायुती सरकारला त्याचे गांभीर्य नाही.

Swapnil S

मुंबई : राज्यातील जनता दुष्काळात होरपळून निघत असताना महायुती सरकारला त्याचे गांभीर्य नाही. लोकसभा निवडणुकीवेळी राज्यात २६७ शेतकरी आत्महत्या झाल्या आणि निवडणुकीनंतरही या आत्महत्या कमी झालेल्या नाहीत. ‘डीबीटी’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुरवली जाणारी खते, बियाणे, औषधे अद्याप दिलेली नाहीत. टेंडर न काढताच मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने अव्वाच्या सव्वा किंमत वाढवून कोट्यवधी रुपयांची खरेदी करण्यात आली, याला विरोध करणाऱ्या कृषी आयुक्तांना बाजूला करण्यात आले. सरकारने राज्यात टँकर माफिया तयार केले आहेत. ही सर्व परिस्थिती पाहता भ्रष्टाचारात बरबटलेले महायुती सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी काँग्रेसने राज्यपालांना भेटून केली असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी सांगितले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन दुष्काळ व राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. या शिष्टमंडळात प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री यशोमती ठाकूर, खा. शोभा बच्छाव, खा. वसंतराव चव्हाण, खा. बळवंत वानखेडे, आ. मोहन हंबर्डे, आ. वजाहत मिर्झा, आ. धीरज लिंगाडे, आमदार माधवराव पाटील-जवळगावकर आदी उपस्थित होते.

राज्यपालांना भेटल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती असताना सरकार सुट्टीवर गेले होते, तर काही मंत्री परदेशात गेले होते. मंत्र्यांना परदेशात जाण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते. या मंत्र्यांनी कोणाची परवानगी घेतली होती, याचा खुलासा झाला पाहिजे. शेतकरी संकटात सापडलेला आहे, त्याला आधाराची गरज आहे. राज्यातील दुष्काळाची परिस्थिती पाहता शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी द्यावी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ४ लाख रुपये द्यावेत, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात व पिण्याच्या पाण्याची सोय करावी. राज्यात खतांचा काळाबाजार सुरू आहे. खरीपाच्या पेरणीसाठी खते आणि बियाणे सरकारने पुरवावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

महापुरुषांचा अपमान सहन करणार नाही

छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले हे आमचे दैवत आहेत. संसद परिसरात असलेल्या या दैवतांचे पुतळे भाजप सरकारने काढले आहेत, त्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवून राष्ट्रपतींना आमच्या भावना कळवा. आमच्या महापुरुषांचा अपमान सहन केला जाणार नाही, असेही नाना पटोले यांनी सांगितले.

जरांगे-पाटील यांच्या उपोषणाची दखल घ्या!

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केलेले आहे, त्याची राज्य सरकारने दखल घ्यावी, अशी मागणी नांदेडचे काँग्रेस खासदार वसंतराव चव्हाण यांनी यावेळी केली.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली