मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची दाट शक्यता असल्यामुळेच काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाविकास आघाडीसोबत घेण्यास काँग्रेस इच्छुक नसल्यामुळे त्यांनी ‘एकला चलो रे’चा मार्ग अवलंबला असला तरी दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये जागावाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या नेत्यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेस नेत्यांनी मुंबईत एकत्र निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
मुंबई महापालिकेसाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने वेगळी चूल मांडण्याचे ठरवल्यामुळे ठाकरे बंधूंची जागावाटपासंदर्भात प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे. राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उद्धव ठाकरेंसमोर १२५ जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र शिवसेना ठाकरे गट मनसेला ७० ते ७५ जागा सोडण्यासाठी तयार असल्याची माहिती आहे. सध्या तरी कुठलेही सूत्र दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाबाबत ठरलेले नसले तरी जवळपास ७० जागा मनसेला सोडण्यास शिवसेना सकारात्मक असल्याची माहिती आहे. मनसेने साधारणपणे उमेदवार असलेल्या आणि लढू शकणाऱ्या तसेच ज्या प्रभागांमध्ये ताकद आहे अशा जवळपास १२५ लोकांची यादी तयार केली आहे.
“मुंबई महापालिका निवडणुकीत आमची मागील खूप वर्षांपासून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पक्षासोबत आघाडी झालेली आहे. येणाऱ्या काळातही मुंबई महापालिका निवडणुकीत आमची आघाडी व्हावी, अशी आमची मनापासूनची इच्छा आहे. या बैठकीनंतर शरद पवारांनी सांगितले की, पुढच्या आठवड्यात दोन्ही पक्षांच्या नेत्यांसोबत चर्चा करू आणि यासंदर्भातील निर्णय एकत्रपणे घेऊ,” अशी माहिती मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी दिली.