राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेच्या प्रमुख आठ नेत्यांसोबत मंत्रपदाची शपथ घेत भाजपशी हातमिळवणी केली. या शपथविधीला आपला पाठिंबा नसल्याचं शरद पवार यांनी जाहीर केलं. यानंतर अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांच्याकडून अनेक गौप्यस्फोट केले गेले. अजित पवार गटाकडून आपणचं मुख्य राष्ट्रवादी असून आमदारांचं बहुमत आपल्याकडे असल्याचा दावा करण्यात आला. तसंच यापुढील निवडणुका या राष्ट्रवादीच्या नाव आणि चिन्हावर लढवणार असल्याचं देखील स्पष्ट केलं गेलं.
यानंतर शरद पवार यांनी महाराष्ट्र पिंजून काढत नव्याने पक्ष बांधणीचा निर्धार केला. त्यांनी त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात ही मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिकमधील येवला मतदार संघातून केली. पवार यांनी घेतलेल्या सभेनंतर आता मंत्री दिलीप वसळे पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. त्यांच्या या आवाहनाने सर्वांना आश्चर्याया धक्का बसला आहे.
शरद पवार हे आपले नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल कोणीही वाईट बोलू नये. आपलं शरद पवार यांच्याशी भांडण नाही. राजकारणाला हापापलेले आपण नाहीत. मात्र, विकासाच्या दृष्टीने आपण काही निर्णय घेतले आहेत. त्यामुळे शरद पवार यांची सभा आपल्या मतदारसंघात झाली तर, आपल्या कार्यकर्त्यांनी सभेला उपस्थित रहावं, असं आवाहन वळसे पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे. वळसे पाटील यांनी त्यांच्या आंबेगाव मतदार संघातील कार्यकर्ता मेळाव्यात हे वक्तव्य केलं आहे.
दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांचं अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. अजित पवार यांनी केलेल्या बंडावेळी वळसे पाटील हे अजित पवार यांच्यासोबत गेल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता.