दुबई : भारतीय संघाने बुधवारी आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात गतविजेत्याच्या थाटात खेळ केला. चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवने (७ धावांत ४ बळी) केलेल्या प्रभावी माऱ्यापुढे संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) फलंदाज ढेपाळले. त्यामुळे त्यांचा संघ १३.१ षटकांत ५७ धावांत गारद झाला. भारताने अवघ्या ४.३ षटकांत हे लक्ष्य गाठून ९ गडी व ९३ चेंडू राखून शानदार विजय नोंदवला.
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना भारताने हार्दिक पंड्याकडे प्रथम चेंडू सोपवला. अर्शदीप सिंगला संघात स्थान लाभले नाही, तसेच संजू सॅमसनला यष्टिरक्षक म्हणून प्राधान्य देण्यात आले. यूएईचे सलामीवीर अलिशान शरफू (२२) व कर्णधार मोहम्मद वासिम (१९) यांनी सुरुवातीच्या ३ षटकांत २६ धावा फलकावर लावल्या. मात्र जसप्रीत बुमराने शरफूचा यॉर्करवर त्रिफळा उडवला. त्यानंतर फिरकीपटूंचे आगमन झाले व त्यांची फलंदाजी आणखी ढेपाळली.
कुलदीपने हर्षित कौशिक, राहुल चोप्रा, मोहम्मद वासिम यांचे बळी मिळवले. त्यानंतर मध्यमगती गोलंदाज शिवम दुबेने ३ बळी घेत यूएईला झटपट गुंडाळले. वरुण चक्रवर्ती व अक्षर पटेलने एक बळी मिळवला.
लक्ष्याचा पाठलाग करताना अभिषेक शर्मा (१६ चेंडूंत ३०) व शुभमन गिल (९ चेंडूंत नाबाद २०) यांनी ४८ धावांची सलामी नोंदवली. सूर्यकुमारने २ चेंडूंत नाबाद ७ धावा केल्या.