इंग्लंडविरुध्दच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या टी-२० सामन्यात बर्मिंगहॅम येथील एजबस्टन क्रिकेट स्टेडियमवर शनिवारी भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांमध्ये आठ बाद १७० धावा केल्या. त्यामुळे विजयासाठी इंग्लंडला १७१ धावांचे लक्ष्य मिळाले. रवींद्र जडेजाने २९ चेंडूत नाबाद ४६ धावा केल्या.
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. १५ षटकांमध्ये भारताच्या पाच बाद ११५ धावा झाल्या होत्या. विराट कोहली एक धाव करून बाद झाला. रिचर्ड ग्लीसनने त्याचा बळी घेतला. आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या ग्लीसनसाठी ही मोठी कामगिरी ठरली. भारतीय सलामीवीरांच्या फटकेबाजीमुळे सहाव्या षटकामध्ये भारताचे अर्धशतक फलकावर लागले. भारताचा कर्णधार रोहित शर्माचे टी-२० क्रिकेटमधील ३०० चौकार पूर्ण झाले. असे करणारा तो जागतिक क्रिकेटमधील दुसरा फलंदाज ठरला. भारताने मालिकेतील पहिला सामना ५० धावांच्या मोठ्या फरकाने जिंकत मालिकेत आघाडी घेतली होती.