मँचेस्टर : महिला टी-२० विश्वचषकात गुरुवारी होणाऱ्या पहिल्या गटातील सामन्यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय महिला संघ बांगलादेशशी भिडणार आहे. स्पर्धेत उपांत्य फेरीचे स्थान निश्चित करण्याच्या दृष्टीने हा सामना भारतासाठी महत्त्वाचा आहे. सलामीच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिली असली, तरी मधल्या फळीतील फलंदाजांची कामगिरी आणि क्षेत्ररक्षणातील चुका भारतासाठी चिंतेचा विषय ठरत आहेत.
भारतीय संघाची मदार स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांच्यावर आहे. मानधनाने तीन सामन्यांत १५९ धावा केल्या आहेत, तर शफालीने ९२ धावांचे योगदान दिले आहे. या दोघींनी १५४च्या स्ट्राईक रेटने धावा करत संघाला वेगवान सुरुवात मिळवून दिली आहे. मात्र, त्यानंतर आलेल्या हरमनप्रीत, जेमिमा रॉड्रिग्ज आणि यास्तिका भाटिया यांना छाप पाडता आलेली नाही. हरमनप्रीत आणि जेमिमा यांनी तीन सामन्यांत मिळून केवळ ११ चौकार मारले असून, एकही षटकार लगावलेला नाही. मधल्या फळीतील या सुमार कामगिरीचा दबाव रिचा घोष आणि दीप्ती शर्मा यांच्यावर येत आहे.
क्षेत्ररक्षणाच्या बाबतीतही भारताला सुधारणा करण्याची गरज आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मागील सामन्यात राधा यादवसारख्या उत्तम क्षेत्ररक्षकाने झेल सोडल्यामुळे संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. बांगलादेशने या स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवत आपला फॉर्म सिद्ध केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्धचा सामना भारतासाठी सोपा नसेल.
भारताचे ३ सामन्यांत ४ गुण असून नेट रनरेट २.५११ आहे. तूर्तास भारत गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र तिसऱ्या क्रमांकावरील आफ्रिका (-०.५४६) भारताला खाली खेचण्यासाठी प्रयत्नशील असेल.
वेळ : सायंकाळी ७ वाजता; थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क