नवी दिल्ली : क्रिकेटला नव्या प्रेक्षकवर्गाशी जोडत जागतिक खेळ बनवण्याच्या दिशेने या महिन्यात भारत आणि जपानदरम्यान होणारा ऐतिहासिक एकमेव टी-२० आंतरराष्ट्रीय सामना हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास बीसीसीआयचे सचिव देवाजित सायकीया यांनी सोमवारी व्यक्त केला.
आयची-नागोया येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या सामन्यांपूर्वी २२ सप्टेंबर रोजी जपानमध्ये भारत आणि जपानचे संघ प्रथमच आमनेसामने येणार आहेत. तोचिगी प्रांतातील सानो इंटरनॅशनल क्रिकेट ग्राऊंडवर सुझुकी कपअंतर्गत हा सामना खेळवला जाईल. भारत आणि जपान यांच्यातील ७५ वर्षांच्या राजनैतिक संबंधांचे औचित्य साधून या सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. क्रिकेटला नव्या भूप्रदेशात नेण्यासाठी 'आयसीसी'चे अध्यक्ष जय शाह यांनी केलेल्या प्रयत्नांचाच हा एक भाग असल्याचे सायकीया यांनी नमूद केले.
टी-२० क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेला भारतीय संघ सध्याचा टी-२० विश्वविजेता आहे, तर जपान ४१ व्या क्रमांकावर आहे. “क्रिकेटचा जागतिक प्रवास अशा क्षणांमुळे आकारास येत आहे, जे या खेळाला त्याच्या पारंपरिक सीमांच्या पलीकडे घेऊन जात आहेत. २२ सप्टेंबर रोजी होणारा भारत-जपान सामना आंतरराष्ट्रीय क्रिकेटला जपानमध्ये घेऊन जात असून, नव्या प्रेक्षकांशी जोड निर्माण करत आहे. जय शहा यांनी बीसीसीआय सचिव म्हणून आणि आता आयसीसी अध्यक्ष म्हणून क्रिकेटच्या जागतिक वाढीला प्रोत्साहन दिले आहे. ऑलिम्पिक चळवळीच्या दिशेने मजबूत मार्ग तयार करणे आणि क्रिकेट खऱ्या अर्थाने जागतिक बनवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे,” असे सैकिया म्हणाले.