ब्रिस्टल : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय टी-२० संघावर सलग दुसऱ्या मालिकेत पराभव पत्करावा लागला. चौथ्या टी-२० सामन्यात इंग्लंडने भारतावर ९ गडी राखून वर्चस्व गाजवले. आता शनिवारी सायंकाळी ७ वाजता पाचवी लढत सुरू होईल. भारतीय संघ मालिकेत ०-३ असा पिछाडीवर आहे.
आयर्लंड संघाविरुद्ध नुकताच विश्वविजेत्या भारतीय संघाला टी-२० मालिका गमवावी लागली. यातून सावरण्यासाठी पुरेसा अवधी मिळालेला नसतानाच भारतीय संघ आता इंग्लंडविरुद्धही सुमार कामगिरी करत आहे. उभय संघांतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. तर दुसऱ्या लढतीत गोलंदाजांनी निराशा केली. तिसऱ्या सामन्यात भारतीय संघ ७५ धावांतच गारद झाला. आता चौथ्या लढतीत भारताच्या फलंदाजांनी पुन्हा निराशा केली. फक्त श्रेयसनेच काहीशी छाप पाडली.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने मार्चमध्ये टी-२० विश्वचषक उंचावला. मात्र आता सूर्यकुमारला भारतीय संघातून वगळत भारताने २०२८चा विश्वचषक व ऑलिम्पिकच्या दृष्टीने संघबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी भारताच्या टी-२० संघातही नसलेला श्रेयस आता कर्णधारपद भूषवण्यासाठी सज्ज असून श्रेयस व प्रशिक्षक गौतम गंभीर यांची जोडी किती यश मिळवणार, हे पाहणे रंजक ठरेल. २०२४मध्ये याच कर्णधार-प्रशिक्षकाच्या जोडीने कोलकाताला आयपीएलचे जेतेपद मिळवून दिले होते.
दरम्यान, १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला पहिल्या तीन लढतीत छाप पाडता आली नाही. तसेच इशान किशन, तिलक वर्मा, अभिषेक शर्मा, श्रेयस यांनीही निराशा केली आहे. संजू सॅमसनला वगळण्याच्या निर्णयाचा भारताला लाभ झालेला नाही.