कोलकाता : अखेर ७० सामन्यांनंतर आयपीएलच्या १९व्या हंगामातील साखळी फेरी समाप्त झाली. रविवारी दुपारी राजस्थानने मुंबईवर मात केल्यामुळे बाद फेरीतील चौथा संघ स्पष्ट झाला. त्यामुळे पंजाब व कोलकाताचेही आव्हान संपुष्टात आले. रविवारी रात्री मग दिल्लीने कोलकाताला धूळ चारून शेवट गोड केला. त्यामुळे राजस्थानच्या पराभवानंतरही कोलकाताला लाभ झाला नसता, हे स्पष्ट झाले. अशाप्रकारे जवळपास २ महिन्यांनी कोलकाताच्या पराभवासह आयपीएलची साखळी फेरी समाप्त झाली.
२८ मार्चपासून सुरू झालेला आयपीएलचा १९वा हंगाम सुरू झाला होता. पंजाबने अखेरच्या साखळी सामन्यात लखनऊला नमवून १५ गुणांपर्यंत मजल मारलेली. त्यामुळे राजस्थान मुंबईकडून पराभूत झाली असती, तर पंजाबने आगेकूच केली असती. मात्र राजस्थानने आठवा विजय नोंदवून १६ गुणांसह बाद फेरी गाठली.
पंजाबने सुरुवातीच्या सातपैकी सहा सामने जिंकले होते. कोलकाताविरुद्ध त्यांना पावसामुळे एका गुणावर समाधान मानावे लागले. हाच एक गुण त्यांना महागात पडला. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच एखादा संघ सुरुवातीच्या सात सामन्यांत अपराजित राहूनही बाद फेरी गाठू शकला नाही. तसेच कोलकाताला १३ गुणांवर समाधान मानावे लागले. अखेरची लढत त्यांना मोठ्या फरकाने जिंकणे गरजेचे होते. मात्र ते पराभूत झाले.