कल्याणी : पारस डोग्राच्या नेतृत्वात खेळणाऱ्या जम्मू आणि काश्मीरने बुधवारी इतिहास रचला. त्यांनी उपांत्य सामन्यात बंगालवर ६ गडी राखून विजय मिळवत प्रथमच रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. स्पर्धेच्या ९१ वर्षांच्या इतिहासात जम्मूला आता ऐतिहासिक जेतेपद खुणावत आहे.
गतवर्षीप्रमाणे यावेळीसुद्धा रणजी स्पर्धा दोन टप्प्यांत खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेचा पहिला टप्पा १५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या काळात पार पडला. मग दरम्यानच्या काळात विजय हजारे एकदिवसीय स्पर्धा व सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धा रंगली. आता २२ जानेवारीपासून रणजीचा दुसरा टप्पा सुरू झाला. २८ फेब्रुवारीला रणजी स्पर्धा समाप्त होईल. गतवर्षी विदर्भाने ही स्पर्धा जिंकली होती. मात्र यंदा कर्नाटकने त्यांना गारद केले. कर्नाटकचा सध्या उत्तराखंडविरुद्ध दुसरा उपांत्य सामना सुरू आहे.
दरम्यान, जम्मूने पहिल्या उपांत्य सामन्यात बुधवारी बंगालने दिलेले १२६ धावांचे लक्ष्य ३४.४ षटकांत चार फलंदाजांच्या मोबदल्यात गाठले. जम्मूचा संघ एकवेळ ४ बाद ७१ अशा स्थितीत होता. मात्र वंशज शर्माने नाबाद ४३, तर अब्दुल समदने नाबाद ३० धावा करताना पाचव्या विकेटसाठी ५५ धावांची अभेद्य भागीदारी रचली. मात्र जम्मूच्या या वाटचालीचा खरा नायक ठरला तो वेगवान गोलंदाज अक्यूब नबी.
पहिल्या डावात बंगालने सुदीप कुमारच्या शतकाच्या बळावर ३२८ धावा केल्या. त्या डावात जम्मूच्या नबीने ५ बळी मिळवले. मग जम्मूने फलंदाजीत ३०२ धावांचे प्रत्युत्तर दिले. अब्दुल समदच्या ८२ धावांच्या खेळीनंतरही त्यांना आघाडी मिळाली नाही. बंगालकडे २६ धावांची आघाडी होती.
मात्र दुसऱ्या डावात नबी आणि सुनील कुमार या वेगवान गोलंदाजांनी प्रत्येकी ४ बळी घेत बंगालला ९९ धावांतच गुंडाळले. त्यामुळे जम्मूसमोर १२६ धावांचे लक्ष्य उभे ठाकले. अखेरीस जम्मूने हे लक्ष्य गाठून अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे कर्नाटकने पहिल्या डावात ७३६ धावा करताना आघाडी घेतली आहे.