ग्लासगो : ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती मीराबाई चानूच्या नेतृत्वाखाली भारतीय वेटलिफ्टिंग संघ आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील मोहिमेसाठी सज्ज झाला आहे. डोपिंगच्या कारवाईमुळे संघाला बसलेला फटका आणि खेळाडूंच्या संख्येत झालेली कपात या आव्हानांवर मात करत राष्ट्रकुल स्पर्धेतील आपले वर्चस्व कायम राखण्याचे भारतीय संघाचे ध्येय आहे.
स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच अनेक खेळाडू डोपिंग चाचणीत दोषी आढळल्यामुळे १६ सदस्यांचा ताफा ११ खेळाडूंवर आणला गेला. ९६ किलो वजनी गटातील दिलबाग सिंग याला या सप्ताहाच्या सुरुवातीलाच संघातून वगळण्यात आल्याने संघाचे संख्याबळ अधिकच घटले.
या अडचणींनंतरही चीन आणि उत्तर कोरियासारख्या बलाढ्य देशांच्या अनुपस्थितीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे पारडे जड मानले जात आहे.
भारताने १९९०, २००२, २०१८ आणि २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये वेटलिफ्टिंग प्रकारात अव्वल स्थान पटकावले आहे. २०२२ च्या बर्मिंगहॅम स्पर्धेत ३ सुवर्ण आणि ३ रौप्यपदकांसह १० पदके मिळवत भारताने चांगले यश मिळवले होते.
भारतीय संघः
महिला : मीराबाई चानू (४८ किलो), ज्ञानेश्वरी यादव (५३ किलो), बिद्याराणी देवी (५८ किलो), निरुपमा देवी (६३ किलो), हरजिंदर कौर (६९ किलो), संजना (७७ किलो), मार्टिना देवी (+८६ किलो).
पुरुष : ऋषिकांत सिंग (६० किलो), एम. राजा (६५ किलो), अजय बाबू (७९ किलो), लवप्रीत सिंग (+११० किलो).