जयपूर : अर्शिन कुलकर्णी, पृथ्वी शॉ आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड यांच्या दमदार खेळीमुळे महाराष्ट्राने विजय हजारे करंडक स्पर्धेत शनिवारी बलाढ्य मुंबईचा १२८ धावांनी पराभव केला. क गटात १६ गुणांसह अग्रस्थानी असणाऱ्या मुंबईचा हा पहिलाच पराभव ठरला.
आता पंजाबसह मुंबईचा संघ अग्रस्थानी आहे. महाराष्ट्राने पाच सामन्यांत तीन विजयांसह १२ गुणांनिशी तिसऱ्या क्रमांकावर मजल मारली आहे. अर्शिन कुलकर्णीने पृथ्वी शॉ याच्यासह १४० धावांची सलामी दिली. पृथ्वीने ७५ चेंडूंत १० चौकार आणि १ षटकारासह ७१ धावा
फटकावल्या. अर्शिनने ११४ चेंडूंत ११ चौकार आणि ३ षटकारांसह सर्वाधिक ११४ धावा केल्या. ऋतुराजने ६६ तर रामकृष्ण घोष याने अवघ्या २७ चेंडूंत ३ चौकार आणि ५ षटकारांची आतषबाजी करत नाबाद ६४ धावा फटकावल्या. त्यामुळे महाराष्ट्राला ४ बाद ३६६ धावा उभारता आल्या.
विजय हजारे करंडक क्रिकेट
प्रत्युत्तरादाखल, सलामीवीर अंगरिक्ष रघुवंशीच्या ९२ धावांच्या खेळीनंतरही मुंबईच्या फलंदाजांनी सपेशल शरणागती पत्करल्यामुळे त्यांचा डाव ४२ षटकांत २३८ धावांवरच गडगडला. मुंबईकडून सिद्धेश लाडने ५२, तर तनुष कोटियनने नाबाद ३६ धावांचे योगदान दिले.