लखनौ : सय्यद मुश्ताक अली करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईला गुरुवारी पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले. संजू सॅमसनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या केरळने मुंबईवर १५ धावांनी मात केली. सर्फराझ खान (४० चेंडूंत ५२ धावा) आणि सूर्यकुमार यादव (२५ चेंडूंत ३२) यांची झुंज अपयशी ठरली.
लखनौच्या इकाना स्टेडियमवरील या लढतीत केरळने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १७८ धावा केल्या. सॅमसनने २८ चेंडूंत ४६, तर विष्णू विनोदने ४३ धावा फटकावल्या. त्यानंतर मुंबईचा संघ १९.४ षटकांत १६३ धावांत गारद झाला. वेगवान गोलंदाज के. आसिफने पाच बळी मिळवून केरळचा विजय साकारला. या पराभवानंतरही मंबई अ-गटात अग्रस्थानी कायम आहे. मुंबईचे पाच सामन्यांत ४ विजयांचे १६ गुण असून केरळ १२ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबईची शनिवारी छत्तीसगडशी गाठ पडेल.
दरम्यान, २६ नोव्हेंबरपासून देशातील विविध शहरांत मुश्ताक अली ही देशांतर्गत टी-२० स्पर्धा सुरू झाली. रणजी स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात सर्व संघांचे पाच साखळी सामने झाल्यावर आता मुश्ताक अली व त्यानंतर विजय हजारे ही देशांतर्गत एकदिवसीय स्पर्धा खेळवण्यात येईल. मुंबईचा संघ हा मुश्ताक अली स्पर्धेचा गतविजेता आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात मुंबईने जेतेपद मिळवले होते. मात्र यंदा श्रेयस जायबंदी असल्याने शार्दूल मुंबईचे नेतृत्व करत आहे.
रणजीप्रमाणेच या स्पर्धेतही ३८ संघांचा समावेश असून त्यांपैकी ३२ संघांची चार एलिट गटात, तर उरलेल्या सहा संघांची प्लेट गटात विभागणी करण्यात आली आहे. अ-गटात मुंबईसह केरळ, छत्तीसगड, विदर्भ, आंध्र प्रदेश, रेल्वे, ओदिशा, आसाम अशा एकूण आठ संघांचा समावेश आहे. मुंबईपुढे यंदा जेतेपद टिकवण्याचे आव्हान असेल. पहिल्या लढतीत मुंबईने रेल्वेवर मात केली, मग दुसऱ्या सामन्यात विदर्भाचा धुव्वा उडवला. तिसऱ्या सामन्यात आयुष म्हात्रेच्या शतकाच्या बळावर मुंबईने आंध्र प्रदेशलाही धूळ चारली.
मंगळवारी झालेल्या चौथ्या साखळी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने २० षटकांत ४ बाद २२० धावांचा डोंगर उभारला. आयुष (२१) व अजिंक्य रहाणे (३३ चेंडूंत ४२) यांनी चांगली सुरुवात केली होती.
महाराष्ट्र, विदर्भाचाही संघर्ष
कोलकाता : मुश्ताक अली स्पर्धेच्या ब-गटात बिहारच्या १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने ६१ चेंडूंत नाबाद १०८ धावा फटकावतानाच विक्रमी शतक साकारले. मात्र कर्णधार पृथ्वी शॉने ३० चेंडूंत ६६ धावा तडकावल्यामुळे महाराष्ट्राने बिहारला ३ गडी व ५ चेंडू राखून पराभूत केले.
प्रथम फलंदाजी करताना वैभवने ७ चौकार-षटकारांसह शतक साकारल्याने बिहारने २० षटकांत ३ बाद १७६ धावांपर्यंत मजल मारली. वैभव हा मुश्ताक अली स्पर्धेत शतक झळकावणारा सर्वात युवा खेळाडू ठरला. त्याचे सध्याचे वय १४ वर्षे २५० दिवस आहे. मात्र वैभवच्या शतकाव्यतिरिक्त अन्य फलंदाज फारशी छाप पाडू शकले नाहीत.
मग लक्ष्याचा पाठलाग करताना पृथ्वीने ११ चौकार व १ षटकारासह ६६ धावा केल्या. त्याला निरज जोशी (३०) व निखिल नाईक (२२) यांची उत्तम साथ लाभली. त्यामुळे महाराष्ट्राने १९.१ षटकांत विजयी लक्ष्य गाठले. महाराष्ट्राचा हा चार सामन्यांत दुसरा विजय ठरला. सध्या ते गटात पाचव्या स्थानी असून त्यांची पुढील लढत मध्य प्रदेशविरुद्ध होईल.