विश्वचषकाच्या रचनेवर संलग्न देशांकडून टीका 
क्रीडा

विश्वचषकाच्या रचनेवर संलग्न देशांकडून टीका

पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या आराखड्यात करण्यात आलेले बदल आंतरराष्ट्रीय क्रिकेटची विश्वासार्हता आणि सचोटी कमकुवत करणारे आहेत, अशी कडक टीका क्रिकेट स्कॉटलंड आणि रॉयल डच क्रिकेट असोसिएशन (केएनसीबी) यांनी केली आहे.

Swapnil S

दुबई : पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या आराखड्यात करण्यात आलेले बदल आंतरराष्ट्रीय क्रिकेटची विश्वासार्हता आणि सचोटी कमकुवत करणारे आहेत, अशी कडक टीका क्रिकेट स्कॉटलंड आणि रॉयल डच क्रिकेट असोसिएशन (केएनसीबी) यांनी केली आहे. हे बदल ज्या प्रक्रियेद्वारे लागू करण्यात आले, त्या प्रक्रियेवरही दोन्ही मंडळांनी संयुक्त निवेदनाद्वारे तीव्र आक्षेप घेतला आहे.

दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे होणाऱ्या २०२७च्या एकदिवसीय विश्वचषकात एकूण १४ देश सहभागी होणार आहेत. मात्र, नव्या रचनेनुसार १३व्या, १४व्या आणि १२व्या क्रमांकावरील संघांना सुरुवातीला पात्रता फेरीत परस्परांविरुद्ध खेळावे लागेल. या फेरीतून केवळ एकच संघ पुढे जाऊन उर्वरित १२ संघांसोबत मुख्य फेरीत प्रवेश करेल. मुख्य फेरीत या १२ संघांची प्रत्येकी सहा संघांच्या दोन गटांत विभागणी केली जाईल.

स्पर्धेला १८ महिन्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक असताना जागतिक नियमन संस्थेने स्वरूप बदलण्याच्या घेतलेल्या निर्णयावर दोन्ही राष्ट्रीय मंडळांनी जोरदार टीका केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) ५० षटकांच्या विश्वचषक पात्रता मार्ग आणि स्पर्धेच्या फॉरमॅटमध्ये करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण संरचनात्मक बदलांमुळे आम्ही अत्यंत निराश झालो आहोत, असे नमूद करण्यात आले आहे.

हे बदल म्हणजे असोसिएट सदस्यांच्या क्रिकेटसाठी मोठा धक्का असून, त्यामुळे क्रिकेटचा विस्तार करण्यासाठी गेल्या काही वर्षांत झालेल्या प्रगतीला बाधा पोहोचण्याचा धोका असल्याचे निवेदनात म्हटले आहे. नवीन प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू असताना, उदयोन्मुख देशांच्या संधी कमी करणे चुकीचा संदेश देते, असेही त्यात स्पष्ट करण्यात आले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

कोलंबियात ७.४ तीव्रतेचा भूकंप; १३२ जणांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, Video

Mumbai : फेरीवाल्यांच्या ओळखपत्रासाठी पावणेदोन कोटींचा खर्च

१५ किलोमीटरसाठी दीड तास! कल्याण-बदलापूर महामार्गावर खड्डे, पाणी अन् कोंडी

वाशीत कौटुंबिक वादातून मुलानेच केली आईची हत्या; आरोपी अटकेत

ठाणेकरांवर करवाढीचे ओझे; प्रशासनाचा प्रस्ताव महासभेत सादर