संग्रहित छायाचित्र 
क्रीडा

पाकिस्तानचा लवकरच यू-टर्न! भारताविरुद्धच्या सामन्याचा निर्णय २४ तासांत: PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी

टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताविरुद्ध खेळण्यास पाकिस्तानने नकार दिल्याने सध्या हा सामना होणार की नाही, याचीच चर्चा जास्त आहे.

Krantee V. Kale

लाहोर : टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याच्या आपल्या निर्णयावरून पाकिस्तान लवकरच पलटी मारण्याची शक्यता आहे. आयसीसीच्या प्रतिनिधिमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

पाकिस्तानचा संघ भारताविरुद्धच्या टी-२० विश्वचषक सामन्यावर बहिष्कार घालणार की नाही, यावर अंतिम निर्णय पुढील २४ तासांत स्पष्ट होईल, असे नक्वी यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना सांगितले. नक्वी म्हणाले की, “पीसीबीने उपस्थित केलेल्या काही मुद्द्यांवर आयसीसी आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून उत्तराची प्रतीक्षा आहे. भारताविरुद्धचा सामना १५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे होणार आहे. आम्ही आयसीसीशी चर्चा केली आहे. सध्या मी कोणतीही टिप्पणी करणे योग्य होणार नाही. त्यांचे उत्तर मिळाल्यावर आम्ही निर्णय घेऊ. आयसीसीचे उत्तर आल्यानंतर आम्ही सल्ल्यासाठी पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याकडे जाऊ. मंगळवारी किंवा बुधवारी या सामन्याविषयीची अंतिम घोषणा केली जाईल.” तथापि, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान सरकारकडूनही आता पीसीबीला हिरवा कंदील मिळाला असून केवळ अधिकृत घोषणा बाकी आहे.

आम्ही कोणत्याही धमक्यांना घाबरणारे नाही

“सध्या आम्ही जास्त काही बोलू शकत नाही, कारण आयसीसी आणि बांगलादेश यांच्यात वाटाघाटी सुरू आहेत. बांगलादेशची भूमिका योग्य होती, त्यामुळे आम्हाला त्यांना पाठिंबा द्यावा लागला,” असेही नक्वी म्हणाले. सुरक्षेच्या कारणास्तव भारतात खेळण्यास नकार दिल्यामुळे बांगलादेशला स्पर्धेतून बाहेर काढण्यात आले आहे. आयसीसीच्या कारवाईच्या इशाऱ्यामुळे पीसीबीवर दबाव असल्याच्या सूचनाही नक्वी यांनी फेटाळून लावल्या. “आम्ही कोणत्याही धमक्यांना घाबरणारे नाही. आपले लष्कर प्रमुख असिम मुनीर कोण आहेत, हे सर्वांना माहीत आहे. आम्हाला कोणत्याही निर्बंधांची चिंता नाही,” असेही नक्वी म्हणाले. दरम्यान, भारताविरुद्ध खेळण्यासाठी पाकिस्तानने ठेवलेल्या काही मागण्या आयसीसीने धुडकावल्या आहेत. तर, बांगलादेशच्या बाबतीत केलेल्या काही मागण्या मान्य करण्यात आल्याचंही समजतंय.

पाकिस्तानने पलटी मारलीच! भारताविरुद्धच्या सामन्यावरील बहिष्कार मागे; नक्वी म्हणतात - "हमने अपने लिए कुछ नहीं किया"

डोंबिवली : गर्दीमुळे पुन्हा एक बळी; परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्याचा धावत्या लोकलमधून पडून मृत्यू

राज्य सरकारमध्ये ७० हजार पदांची लवकरच भरती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

Mumbai : विद्याविहारमध्ये तीन वर्षांच्या चिमुकल्याला पळवण्याचा प्रयत्न; रहिवाशांनी चोप देत आरोपी महिलेला केले पोलिसांच्या हवाली

कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर! महाशिवरात्रीनिमित्त CSMT-सावंतवाडी रोड विशेष ट्रेन; वाचा वेळापत्रक