मध्य प्रदेशचा कर्णधार आदित्य श्रीवास्तवचे गेल्या वर्षी लग्न झाले होते. तो माझ्याकडे आला आणि लग्नासाठी किती दिवसांची सुट्टी घेऊ, असे त्याने मला विचारले. मग त्याला दोन दिवसांची सुट्टी घेण्यास सांगितले, अशी आठवण मध्य प्रदेश संघाचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनी सांगितली.
प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेश क्रिकेट संघाने देशांतर्गत क्रिकेटमध्ये इतिहास रचला. पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली मध्य प्रदेशने ४१ वेळा चॅम्पियन संघ राहिलेल्या मुंबईचा सहा गडी राखून पराभव केला. प्रथमच रणजी चॅम्पियन होण्याचा मान मिळविला. प्रशिक्षक पंडित यांच्यासाठी हा विजय खूपच खास होता. पंडित हे कर्णधार आदित्य श्रीवास्तवचे प्रिय मानले जातात. परंतु गुरु आणि शिष्य यांच्यातील नात्यासाठी ते कठोरपणेही वागले. आदित्यने गेल्या वर्षी लग्नासाठी दहा दिवस सुट्टी मागितली; पण पंडित यांनी लग्न आणि त्याचे सेलिब्रेशन यासाठी दोन दिवसाचीच सुट्टी दिली. या आठवणीला पंडित यांनी विजेतेपद पटकावल्यानंतर उजाळा दिला. विजेतेपदाबद्दल पंडित म्हणाले की, रणजी करंडक जिंकणे खूप खास आहे. २३ वर्षांपूर्वी जे काही चुकले होते, त्याची भरपाई २०२२ मध्ये झाली. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर १९९८-९९च्या अंतिम फेरीत मध्य प्रदेशवर कर्नाटकने सहा गडी राखून विजय मिळविला होता. पंडित यांनी २०२२ मध्ये त्याच संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून यश मिळविले.