नवी दिल्ली : भारताचा तारांकित फलंदाज विराट कोहली आगामी विजय हजारे करंडक या देशांतर्गत एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. विराटचा दोन सामन्यांसाठी दिल्लीच्या संघात समावेश करण्यात आला असून ऋषभ पंतकडे दिल्ली संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.
२४ डिसेंबरपासून देशातील विविध शहरांज विजय हजारे स्पर्धेला प्रारंभ होईल. १८ जानेवारीपर्यंत रंगणाऱ्या या स्पर्धेत रणजीप्रमाणेच ३८ संघ सहभागी झाले आहेत. त्यांपैकी ३२ संघांची चार एलिट गटात, तर उर्वरित ६ संघांची प्लेट गटात विभागणी करण्यात आली आहे. रविवारी रोहित शर्मानेसुद्धा मुंबईकडून खेळणार असल्याचे जाहीर केले होते. त्याचादेखील दोन सामन्यांसाठी समावेश करण्यात आला आहे.
बीसीसीआयने गेल्या वर्षीपासून प्रमुख खेळाडूंनाही रणजी स्पर्धेत अथवा अन्य देशांतर्गत स्पर्धेत खेळणे अनिवार्य केले आहे. एखादा खेळाडू भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत नसल्यास त्याने त्यावेळी सुरू असलेल्या देशांतर्गत स्पर्धेत खेळणे गरजेचे आहे. तसेच दुखापतीमुळे खेळाडू भारतीय संघाबाहेर गेला, तरी त्याला देशांतर्गत स्पर्धेत खेळून पुन्हा लय मिळवण्यासह तंदुरुस्ती सिद्ध करणे अनिवार्य आहे.
दिल्लीचा ड-गटात समावेश असून ते आंध्र प्रदेशविरुद्ध पहिला, तर गुजरातविरुद्ध दुसरा सामना खेळतील. दिल्लीचे सर्व साखळी सामने बंगळुरू येथे होतील. त्यामुळे या लढतींना गर्दी होण्याची शक्यता आहे. कारण विराट आयपीएलमध्ये बंगळुरूकडूनच खेळतो. ३७ वर्षीय विराट सध्या कसोटी व टी-२० प्रकारांतून निवृत्त झालेला असून फक्त एकदिवसीय प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करतो. ११ जानेवारीपासून भारताची न्यूझीलंडविरुद्ध ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका रंगणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी विराट या स्पर्धेत खेळून लय टिकवणार आहे.
पंत व विराट पहिल्या दोन सामन्यांनंतर पुढे खेळतील की नाही, याचा निर्णय नंतर घेण्यात येईल. तसेच हर्षित राणासुद्धा या संघात दाखल होण्याची शक्यता आहे. जानेवारीच्या ११ तारखेपर्यंत भारताचा सामना नसल्याने अनेक खेळाडू विजय हजारे स्पर्धेत खेळताना दिसतील. त्यामुळे या स्पर्धेकडे लक्ष लागून आहे.
दिल्लीचा संघ
ऋषभ पंत (कर्णधार), आयुष बदोनी, विराट कोहली, अर्पित राणा, यश धूल, सार्थक रंजन, प्रियांश आर्या, तेजस्वी सिंग, नितीश राणा, ऋतिक शौकीन, हर्ष त्यागी, सिमरजीत सिंग, प्रिन्स यादव, दिवीज मेहरा, आयुष दोसेजा, वैभव कंडपाल, रोहन राणा, इशांत शर्मा, नवदीप सैनी, अनुज रावत.