मुंबई : मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या लवकरच ५० वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्ताने मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) आयोजित केलेल्या विशेष सप्ताह सोहळ्याला रविवारी प्रारंभ झाला. यावेळी एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्या हस्ते मुंबईच्या पुरुष व महिला संघाच्या आजी-माजी कर्णधारांचा सन्मान करण्यात आला. वानखेडेवरील पहिला सामना खेळणारे सुनील गावस्कर यांची उपस्थिती यावेळी लक्षवेधी ठरली.
१९७४मध्ये बांधणी करण्यात आलेल्या या स्टेडियमवर १९७५मध्ये भारत-वेस्ट इंडिज यांच्यात पहिली कसोटी खेळवण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत वानखेडेने चाहत्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले. वानखेडेचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्यासाठी एमसीएने १२ ते १९ जानेवारी दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे ठरवले आहे. या उपक्रमाच्या पहिल्या दिवशी मुंबईतील क्रीडा पत्रकार तसेच एमसीएच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सामना खेळवण्यात आला. त्यानंतर गावस्कर, चंद्रकांत पंडित, लालचंद राजपूत, संजय मांजरेकर, सिद्धेश लाड, वासिम जाफर, पृथ्वी शॉ यांसारख्या मुंबईच्या माजी कर्णधार तसेच खेळाडूंचा गौरव करण्यात आला. तसेच विनोद कांबळीनेही यावेळी वानखेडे गाठले होते.
“५० वर्षांपूर्वी वानखेडेवर वेस्ट इंडिजविरुद्ध खेळलेला पहिला सामना मला आजही स्मरणात आहे. २०११चा विश्वचषक भारताने याच स्टेडियममध्ये जिंकल्याने वानखेडेचे महत्त्व अधिक वाढले. मी सलामीचा फलंदाज होतो. त्यामुळे या जल्लोष सोहळ्याची सुरुवात माझ्या गौरवाद्वारे केल्यामुळे मी एमसीएचे आभार मानतो,” असे गावस्कर म्हणाले. “वानखेडे स्टेडियमला ऐतिहासिक वारसा आहे. सध्याची पिढी तसेच येणाऱ्या पिढीला वानखेडे आणि मुंबई क्रिकेटचे महत्त्व समजावे, या हेतूने हा जल्लोष सोहळा पूर्ण आठवडाभर सुरू राहणार आहे,” असे एमसीचे अध्यक्ष अजिंक्य नाईक म्हणाले.
१९ जानेवारीला वानखेडेवर शानदार सोहळा होणार असून आजी-माजी क्रिकेटपटू, राजकीय क्षेत्रातील मान्यवर यासाठी उपस्थित असतील. सचिन तेंडुलकर, गावस्कर, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव या सोहळ्यासाठी हजेरी लावतील. आता १५ जानेवारी रोजी एमसीएचे क्लब तसेच वानखेडेच्या मैदानाची काळजी घेणाऱ्या क्युरेटर्सचा गौरव करण्यात येईल.