कँडी : १९ जुलैपासून रंगणाऱ्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय महिला संघ बुधवारी श्रीलंकेत दाखल झाला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाची पहिल्याच लढतीत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी गाठ पडणार आहे.
भारताने सर्वाधिक ८ वेळा ही स्पर्धा जिंकली असून २०२२मध्ये झालेल्या गेल्या आशिया चषकातसुद्धा भारतानेच जेतेपद मिळवले होते. यंदा बांगलादेशमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने आशिया चषकाचे महत्त्व वाढले आहे.
या स्पर्धेत ८ संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली असून भारताला अनुक्रमे पाकिस्तान, यूएई आणि नेपाळ या संघांशी दोन हात करायचे आहेत. भारताने नुकताच दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-२० मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. या मालिकेत खेळलेल्या १७ पैकी १५ खेळाडूंनाच आशिया चषकासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. भारताचेच पारडे या स्पर्धेसाठी जड मानले जात आहे.