ठाणे

डोंबिवली : गर्दीमुळे पुन्हा एक बळी; परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्याचा धावत्या लोकलमधून पडून मृत्यू

बारावीच्या परीक्षेचा पहिला पेपर असल्याने सोहम आज सकाळी डोंबिवलीहून कळव्याकडे निघाला होता. कळव्यातील कॉलेजमध्ये त्याचे एक्झाम सेंटर होते. मात्र...

किशोरी घायवट-उबाळे

मुंबई आणि उपनगरांसाठी जीवनवाहिनी मानली जाणारी लोकल रेल्वे पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. डोंबिवलीतील सोहम कटरे (वय १८) या विद्यार्थ्याचा लोकल ट्रेनमधून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बारावीच्या परीक्षेसाठी जात असताना ही घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बारावीच्या परीक्षेचा पहिला पेपर असल्याने सोहम आज (दि.१०) सकाळी डोंबिवलीहून कळव्याकडे निघाला होता. कळव्यातील मनिषा विद्यालय हे त्याचे परीक्षा केंद्र होते. मात्र, कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान प्रवास करत असताना गर्दीने भरलेल्या धावत्या लोकलमध्ये तोल जाऊन तो दरवाज्यातून खाली पडला.

या अपघातात सोहम गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. लोकलमधील प्रचंड गर्दीमुळेच हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरवाज्यात उभे राहून प्रवास करण्याची वेळ येत असल्याने अनेक प्रवासी अशा धोकादायक परिस्थितीतून प्रवास करत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे.

'मुंबई लोकलमधील वाढती गर्दी' हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून ऐरणीवर आहे. आतापर्यंत अनेक प्रवाशांना याच गर्दीमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच बारावीच्या परीक्षेला निघालेल्या तरुण विद्यार्थ्याचा हकनाक बळी गेल्याने लोकलमधील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या घटनेनंतर प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून लोकलमधील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.

रेमंड ग्रुपचे माजी अध्यक्ष विजयपत सिंघानिया अनंतात विलीन; पुत्र गौतम सिंघानिया यांनी दिला मुखाग्नी

प्रवाशांसाठी खुशखबर! नवी मुंबई विमानतळावरून इंडिगोच्या ३० पेक्षा जास्त फ्लाइट्स सुरू; देशभरात कनेक्टिव्हिटी वाढणार

Mumbai : गॅस सेवांच्या नावाखाली सायबर फसवणूक; APK फाइलने काही मिनिटांत बँक खाती रिकामी, काय काळजी घ्यावी?

Maharashtra Weather Update : राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन

ठाणे जिल्ह्यात प्रति कुटुंब तीन लिटर रॉकेल; ग्रामीण भागासाठी रॉकेलचा कोटा मंजूर