भिवंडी : चंद्रदर्शन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी साजऱ्या करण्यात येणाऱ्या रमजान ईदनिमित्त भिवंडी शहरात सकाळच्या सत्रात जड व अवजड वाहनांसह मोठ्या प्रवासी वाहनांना शहरात येण्यास बंदी केल्याचा अध्यादेश ठाणे शहर वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्तांनी प्रसिद्धीस दिला आहे.
रमजान ईदनिमित्त मुस्लिम बांधव सकाळपासून नमाज अदा करण्यासाठी शहरातील विविध मशिदीमध्ये जमा होतात. त्यातच शहरातील अनेक मशीद वाहतुकीच्या मार्गावर असल्याने त्या परिसरात वाहतूककोंडी होऊ नये व परिसरातील वाहतूक सुरळीत राहावी, हे आम जनतेच्या सोयीसाठी आवश्यक असल्याने ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी ३१ मार्च रोजी किंवा एक दिवस मागेपुढे पहाटे ५ ते दुपारी १२ वाजेपर्यंत विविध मार्गावरील जड व अवजड वाहने शहरात आणण्यास बंदी केली असून त्या वाहनांना पुढील मार्गक्रमण करण्यासाठी पर्यायी मार्गाची सोय केली आहे. तर हलक्या वाहनांना देखील पर्यायी मार्ग सुचविले आहेत.
भिवंडी शहराबाहेर कल्याणरोड साईबाबा जकात नाका, अंजूरफाटा, नदीनाका व वडपे या ठिकाणी जड व अवजड नाका येथून जड वाहनांना प्रवेश बंद केला असून एसटी बसेस देखील या वेळेत शहरात न येता तेथेच थांबणार आहेत.