ठाणे

भिवंडीत पाण्याची भीषण टंचाई; श्रमजीवीचा आज हंडा मोर्चा

Swapnil S

भिवंडी : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानंतरही आदिवासींची पाण्यासाठीची वणवण कमी होताना दिसून येत नाही. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जलजीवनच्या माध्यमातून देशाची तहान भागवण्याचा प्रयत्नही योजनेत मोठ्या प्रमाणात होत असलेल्या भ्रष्टाचारामुळे सपशेल फोल ठरत आहे. दरम्यान अशाच प्रकारे भिवंडी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत जुनांदूरखी- टेंभवली हद्दीतील जुनांदूरखी येथील कोदीपाडा या आदिवासी पाड्यात पाण्याच्या भीषण टंचाईने आदिवासी गोरगरीबांचे हाल होत आहेत. याबाबत श्रमजीवी संघटनेने ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात सोमवारी हंडा मोर्चाचे आयोजन केले आहे. सदर मोर्चाच्या प्रचारासाठी रविवारी मीटिंग घेण्यात आली.

कोदीपाड्यातील पाण्याच्या भीषण टंचाईमुळे महिलांना जंगलात असलेल्या एका छोट्या विहिरीवर पाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे समोर आले आहे. तर या विहिरीमधील पाणी एप्रिलच्या मध्यापर्यंत आटत असल्याने त्यानंतर आजूबाजूच्या गावातून पाणी विकत आणावे लागत असल्याची गंभीर बाब येथील आदिवासींनी बोलताना सांगितली. तसेच शेवटी पाणी भरण्यासाठी विहिरीत उतरून डब्याने पाणी भरावे लागत आहे. यासह लग्न कार्यक्रम, घरे बांधण्यासाठी टँकरने पाणी आणावे लागतेे, तर महिलांसह लहान मुलींना पाणी भरण्यासाठी पूर्ण दिवस लागतो. याप्रसंगी श्रमजीवीचे तालुका अध्यक्ष सागर देसक, भिवंडी कामगार संघटना तालुका अध्यक्ष महेंद्र निरगुडा, उपाध्यक्ष प्रदीप चौधरी, सचिव नामकुडा, गुरुनाथ जाधव, अनिल धोडदा आदी उपस्थित होते.

आदिवासी समाजाची पाण्यासाठी फरफट

जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून करोडो रुपयांचा निधी गावासाठी मंजूर झाला आहे. मात्र ठेकेदाराने काम चालू न केल्याने आदिवासी समाजाची पाण्यासाठी फरफट होत आहे. आदिवासींची पाण्याची मूलभूत समस्या दूर करण्यासाठी कोदीपाड्यातील महिलांना सोबत घेऊन सोमवारी १ एप्रिल रोजी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चाचे आयोजन केल्याचे श्रमजीवी संघटनेचे तालुका अध्यक्ष सागर देसक यांनी सांगितले आहे.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल