आधारवाडी कारागृहातील कैद्याच्या मृत्यूने खळबळ; उपचारात विलंब झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
ठाणे

Kalyan : आधारवाडी कारागृहातील कैद्याच्या मृत्यूने खळबळ; उपचारात विलंब झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप

कल्याणमधील आधारवाडी कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या ऋषिकेश पवार यांच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. उपचारात विलंब झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून, कारागृह प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Mayuri Gawade

कल्याणमधील आधारवाडी कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका कैद्याच्या संशयास्पद मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. मृत कैद्याच्या कुटुंबीयांनी कारागृह प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप करत संताप व्यक्त केला आहे. मृत कैद्याचे नाव ऋषिकेश पवार असे असून, तो एका गुन्ह्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत होता.

माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास पवार याने छातीत दुखत असल्याची तक्रार कारागृहात केली होती. मात्र, त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात न नेता जवळपास चार तासांनंतर, रात्री ९ वाजण्याच्या सुमारास उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, उपचारात झालेल्या याच विलंबामुळे त्याचा मृत्यू झाला.

कारागृह प्रशासनावर गंभीर आरोप

या घटनेनंतर आधारवाडी कारागृह प्रशासनाच्या कामकाजावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पवार यांची प्रकृती खालावत असतानाही वेळेत वैद्यकीय मदत देण्यात आली नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

वादात आणखी भर घालत, पवार यांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकेचा वापर करण्यात आला नसल्याचाही दावा करण्यात आला आहे. कारागृह अधीक्षकांच्या खासगी बोलेरो वाहनातून त्यांना रुग्णालयात नेण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतरही तातडीने उपचार का देण्यात आले नाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

रुग्णालयात गोंधळ, आंदोलनाचा इशारा

मृत्यूची माहिती समोर आल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये गर्दी करत गोंधळ घातला. संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. या प्रकरणात न्याय न मिळाल्यास मोठं आंदोलन छेडण्याचा इशाराही पवार कुटुंबीयांनी दिला आहे.

या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. कारागृह प्रशासनाकडून खरोखर निष्काळजीपणा झाला का, हे अधिकृत चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्राचा आंदोलनाचा इशारा

Mumbai : अंधेरी सब-वे ‘उड्डाणपूल’ अशक्य; सल्लागाराचा मुंबई महापालिकेला अहवाल सादर 

FDI साठी कार्यपद्धती; अर्जांवर आता तीन महिन्यांत निर्णय, नवी नियमावली जाहीर, प्रक्रिया होणार कागदाशिवाय

Mumbai : चार्जिंग गन पॉइंट चोरीला; शिवाजी नगर डेपोतील धक्कादायक प्रकार उघडकीस

जहाजांवर अडकलेल्या ५० खलाशांची सुटका करा; उच्च न्यायालयाचे सक्त आदेश