कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात येत्या मंगळवारी, २ जून रोजी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत तब्बल १२ तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, यंदा ‘अल निनो’ आणि ‘आयओडी’च्या प्रभावामुळे पावसाळा लांबण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
आगामी काळात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी जलसंपदा विभागाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार ही पाणी कपात करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.
या कालावधीत बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा येथील जलशुद्धीकरण केंद्रांमधून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे कल्याण पूर्व आणि पश्चिम, डोंबिवली पूर्व आणि पश्चिम, मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी तसेच कल्याण ग्रामीण भागातील इतर गावे या सर्व परिसरांतील नागरिकांना पाणी कपातीचा फटका बसणार आहे.