कल्याण : मुंबई उच्च न्यायालयातील लिपिक पदासाठी घेण्यात आलेल्या टायपिंग स्किल टेस्टदरम्यान कल्याण एपीएमसी मार्केटमधील परीक्षा केंद्रावर रविवारी मोठा गोंधळ झाला. संगणक आणि कीबोर्डमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने परीक्षा देता आली नसल्याचा आरोप उमेदवारांनी केला. सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत समस्या कायम राहिल्याने सुमारे ४०० ते ५०० उमेदवार संतप्त झाले.
परीक्षा केंद्रावर जुनी व धूळखात पडलेली संगणक यंत्रणा वापरण्यात आल्याचा आरोपही उमेदवारांनी केला. तसेच केंद्रावर पिण्याचे पाणी आणि अन्य मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने उमेदवारांच्या संतापात भर पडली. अखेर संतप्त उमेदवारांनी परीक्षा केंद्राबाहेर ठिय्या आंदोलन केले. आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
परीक्षा केंद्रात व्हिडिओ चित्रीकरण करणाऱ्या उमेदवारांवर त्याच्या आधारे कारवाई केली जात असल्याचा आरोपही काही उमेदवारांनी केला. या प्रकारामुळे उच्च न्यायालयाच्या भरती प्रक्रियेतील नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, तांत्रिक अडचणींचा सामना करणाऱ्या उमेदवारांसाठी तातडीने पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली.