ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत उड्डाणपुलावरील एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आल्यानंतर आता खारेगाव खाडी उड्डाणपूलही २८ एप्रिल रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. त्यामुळे ठाण्याहून नाशिककडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूककोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार असल्याचा दावा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) केला आहे.
ठाणे महापालिका हद्दीतून जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गावर गेल्या काही वर्षांत वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. समृद्धी महामार्गाशी जोडणी झाल्यामुळे भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन या मार्गाचे रुंदीकरण तसेच उड्डाणपुलांची कामे हाती घेण्यात आली आहेत. खारेगाव टोलनाक्यानजीक जुन्या साकेत पुलाच्या शेजारी नवीन उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. यामुळे ठाण्याहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी उड्डाणपूल संपल्यानंतर अरुंद रस्त्यामुळे वाहतूक पुन्हा मंदावत असल्याची स्थिती कायम आहे.
दरम्यान, खारेगाव खाडी उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून सध्या पुलाची लोड टेस्टिंग प्रक्रिया सुरू आहे. ही चाचणी शनिवारी पूर्ण होणार असून त्यानंतर तपासणी अहवाल जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर मंगळवार, २८ एप्रिल रोजी हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता सुभाष बोरसे यांनी दिली. या प्रकल्पामुळे ठाणे-नाशिक मार्गावरील वाहतूककोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटेल, असा दावा एमएसआरडीसीकडून करण्यात आला आहे.
साकेत जुन्या पुलाच्या एका मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात
ठाण्याहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या जुन्या साकेत उड्डाणपुलाला समांतर नवीन पूल सुरू करण्यात आला असून सध्या एका मार्गिकेचे काम पूर्णत्वाकडे गेले आहे. ही मार्गिका येत्या सोमवारी किंवा मंगळवारी वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार असून त्यानंतर दुसऱ्या मार्गिकेचे कामही हाती घेण्यात येणार असल्याची माहिती एमएसआरडीसी प्रशासनाने दिली आहे.