ठाणे : शहरातील वाढत्या वाहतुककोंडीमुळे नागरिकांचे प्रवासाचे जीवन अत्यंत त्रस्त झाले असून, या समस्येवर उपाय म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) तर्फे ठाणे महानगरपालिकेपासून ट्रॅफिक मार्च आयोजित केला जाणार आहे. या आंदोलनाद्वारे नागरिकांना वाहतूक व्यवस्थेतील अडचणींबाबत जागरूक करणे आणि प्रशासनाचे लक्ष वेधणे हा मुख्य उद्देश आहे.
ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करत ठाण्यात दररोज वाढती वाहतूक आणि रोडवरील अडथळ्यांमुळे नागरिकांना गंभीर त्रास सहन करावा लागतो. ठाणेकरांनी आपला आवाज ऐकवण्यासाठी आणि प्रशासनाने वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी हा ट्रॅफिक मार्च अत्यंत महत्त्वाचा आहे, असे जाधव यांनी सांगितले.
हा मार्च शनिवारी संध्याकाळी ५.३० वा. ठाणे ठाणे महानगरपालिका येथून सुरू होणार आहे. त्यामुळे मनसेच्या वतीने नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असून, या मार्चमध्ये स्थानिक नागरिक, विद्यार्थी, व्यापारी आणि विविध संघटनांचे सदस्य सहभागी होणार आहेत. मार्चच्या माध्यमातून ठाण्यातील वाहतूक अडथळे, पार्किंग समस्या, रस्त्यावरील दुरुस्तीच्या अडचणी यांसारख्या मुद्द्यांवर प्रशासनाचे लक्ष वेधले जाणार आहे.
मनसेच्या ट्रॅफिक मार्चच्या माध्यमातून शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, नागरिकांना यामध्ये सक्रिय सहभागी होऊन ठाणे शहरातील प्रवास सुलभ करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.