ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा बायपासवर सोमवारी दुपारी भीषण अपघात झाला. या अपघातात ३ तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गावदेवी मंदिराजवळ स्कूटरला मागून येणाऱ्या एका कंटेनर ट्रकने जोरदार धडक दिली. अपघातानंतर ट्रकचा चालक पळून गेला.
दुपारी साधारण ३ वाजताच्या सुमारास हसन अक्रम शेख (वय १९), अफजल सकूर शेख (वय २२) आणि मोहिनुद्दीन मोहम्मद खुशीशेख (वय १९) हे तिघे जण दुचाकीवरून शिळफाट्याकडे जात होते. अचानक मागून आलेल्या कंटेनर ट्रकने त्यांच्या स्कूटरला धडक दिली. धडक इतकी जबर होती, की तिघेही गंभीर जखमी झाले.
स्थानिकांनी तातडीने तिघांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे मुंब्रा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ट्रक चालक फरार, गुन्हा दाखल
अपघातानंतर कंटेनर ट्रकचा चालक आणि मालक घटनास्थळावरून पसार झाले. मुंब्रा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. दरम्यान, अपघातग्रस्त दुचाकी ऍक्सिस ऍक्टिवा असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या अपघातानंतर परिसरातील रहिवाशांनी संताप व्यक्त केला. “मुंब्रा बायपास हा अपघातप्रवण मार्ग असून, येथे धावणाऱ्या कंटेनर ट्रकांची योग्य तपासणी होत नाही,” असा आरोप स्थानिकांनी केला. अपघातानंतर मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमले होते.