ठाणे : बहुचर्चित ठाणे-बोरिवली दुहेरी टनेल प्रकल्पाच्या प्रत्यक्ष खोदकामाला मंगळवारपासून सुरुवात होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत.
या प्रकल्पासाठी ‘नायक’ नावाचे अत्याधुनिक टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) वापरण्यात येणार असून हे देशातील एकमेव सिंगल शिल्ड हार्ड रॉक मशीन असल्याचे सांगितले जात आहे. कठीण खडकातून सुरक्षित आणि वेगवान पद्धतीने भुयार खोदण्यासाठी या यंत्राचा वापर होणार आहे.
सध्या ठाणे ते बोरिवली दरम्यान प्रवास करण्यासाठी घोडबंदर मार्ग हा मुख्य पर्याय असून रोजच्या वाहतूककोंडीमुळे प्रवाशांना दीड ते दोन तासांचा कालावधी लागतो. मात्र, हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हे अंतर अवघ्या १५ मिनिटांत पार करता येणार असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून वाहतूककोंडी कमी करण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
असा आहे भुयारी मार्ग
सुमारे १० किलोमीटर लांबीचा दुहेरी टनेल संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालील भागातून जाणार आहे. ठाणे ते बोरिवली हा सध्याचा सुमारे ११.८४ किलोमीटरचा प्रवास लोकांसाठी वेळखाऊ आणि त्रासदायक ठरत आहे. नव्या टनेलमुळे हा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. मुंबई-ठाणे दरम्यानची वाहतूककोंडी फुटण्यास मदत होणार आहे.