ठाण्यात उष्णतेच्या कहरास प्रदूषणाचा विळखा छायाचित्र : दीपक कुरकुंडे
ठाणे

ठाण्यात उष्णतेच्या कहरास प्रदूषणाचा विळखा

जागतिक हवामान दिनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात उष्णतेचा पारा आणि हवेतील सल्फर डायऑक्साइड, ओझोन व घातक धूलिकणांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. मार्चच्या सुरुवातीलाच तापमानाने ४१ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठल्याने ठाणेकर होरपळून निघत असून, हवेतील या विषारी घटकांमुळे सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे.

Swapnil S

अतुल जाधव/ठाणे

जागतिक हवामान दिनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात उष्णतेचा पारा आणि हवेतील सल्फर डायऑक्साइड, ओझोन व घातक धूलिकणांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. मार्चच्या सुरुवातीलाच तापमानाने ४१ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठल्याने ठाणेकर होरपळून निघत असून, हवेतील या विषारी घटकांमुळे सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे.

महापालिकेकडून मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, चालू महिन्यातील पहिल्या २० दिवसांपैकी तब्बल १० दिवस हवा अतिशय दूषित नोंदवली गेली आहे. यामध्ये ओझोनची पातळी १८८ पर्यंत पोहोचली असून, धूलिकणांचे (पीएम१०) प्रमाण १३० च्या आसपास नोंदवले गेले आहे. त्यामुळे शहरातील हवेची गुणवत्ता झपाट्याने खालावत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वाढती वाहनसंख्या आणि ठिकठिकाणी सुरू असलेली बांधकामे या परिस्थितीला अधिक गंभीर बनवत आहेत. पर्यावरण अभ्यासकांनी ही स्थिती हवामान बदलाच्या व्यापक संकटाचा भाग असल्याचे स्पष्ट केले आहे. यावर मात करण्यासाठी बांधकामातील धूळ नियंत्रण, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करणे आणि मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करणे अत्यावश्यक झाले आहे. जागतिक हवामान दिन हा केवळ औपचारिक कार्यक्रम न ठरता पर्यावरण संवर्धनासाठी ठोस कृतीची हाक ठरावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

४१°C तापमान आणि १८८ पर्यंत पोहोचलेली ओझोनची पातळी हा ठाणेकरांच्या आरोग्यासाठी धोक्याचा इशारा मानला जात आहे. सिमेंटच्या जंगलांमुळे शहराचे रूपांतर ‘अर्बन हीट आयलंड’मध्ये झाले असून, रात्रीही नैसर्गिक थंडावा मिळेनासा झाला आहे. प्रशासनाने केवळ कागदी घोषणा न करता प्रदूषण नियंत्रण आणि हरित क्षेत्र वाढवण्यासाठी युद्धपातळीवर ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे; अन्यथा ठाण्याची राहण्यायोग्यता धोक्यात येऊ शकते.
डॉ. प्रशांत सिनकर (पर्यावरण अभ्यासक, ठाणे)

‘सायलेंट किलर’ स्थिती

वाढती उष्णता आणि प्रदूषण यांचा परस्पर संबंध अतिशय घनिष्ठ आहे. कडक उन्हामुळे जमिनीलगत वाहनांचा धूर, औद्योगिक उत्सर्जन आणि बांधकामातील धूळ यांची रासायनिक प्रक्रिया होऊन ओझोनसारख्या घातक वायूंची निर्मिती वाढते. हे प्रदूषक ‘सायलेंट किलर’ ठरत असून, यामुळे दमा, श्वसनाचे विकार आणि हृदयविकाराचा धोका वाढत असल्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. ठाणे-मुंबई परिसरात झपाट्याने होणारे काँक्रीटीकरण आणि घटते हरित क्षेत्र यामुळे शहरात ‘अर्बन हीट आयलंड’ प्रभाव वाढत आहे. सिमेंटची जंगले दिवसा उष्णता शोषून घेत असल्याने रात्रीच्या वेळीही नैसर्गिक थंडावा मिळेनासा झाला आहे.

Mumbai : भटक्या कुत्र्यांचा उपद्रव कायम; २५ हजारांवर कुत्र्यांचे निर्बीजीकरण; तरीही त्रास सुरूच

कच्च्या तेलाच्या आयातीचा खर्च वाढणार; इथेनॉल उद्योग २० टक्के मिश्रण पुरवण्यास सज्ज

दक्षिण मुंबईतील शौचालय प्रकल्प संशयाच्या भोवऱ्यात; महापालिका अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात

उदयोन्मुख अर्थव्यवस्थांसाठी भारत मार्गदर्शक बनणार; केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे प्रतिपादन

मुंबईला पुराचा धोका वाढला! १३० नवीन फ्लडिंग पॉइंट; ५६१ ठिकाणी पाणी तुंबण्याचा धोका