ठाणे

Thane : घोडबंदर रस्त्याचे काम रखडणार; डिसेंबरपर्यंत विलीनीकरणाचे काम पूर्ण करण्यात आयुक्त सौरभ राव यांची असमर्थता

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेला दावा ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी खोडून काढला आहे.

Swapnil S

ठाणे : घोडबंदर येथे नेहमी होणारी वाहतूककोंडी थांबवण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. घोडबंदर सेवा रस्ता मुख्य रस्ता विलीनीकरणाचे काम पाऊस थांबल्यानंतर पुन्हा एकदा सुरू झाले आहे. हे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होऊन घोडबंदरकरांची वाहतूककोंडीतून मुक्तता होईल, असा दावा पुन्हा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केला. परंतु त्यांचा हा दावा आता ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी खोडून काढला आहे. हे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार नाही. हे काम फेब्रुवारी २०२६ अखेर पूर्ण होईल, असे राव यांनी स्पष्ट केले. याचाच अर्थ या रस्त्याच्या कामाची डेडलाइन दोन महिन्यांनी वाढणार असल्याचेच दिसत आहे.

ठाणे महापालिकेतील कै. अरविंद पेंडसे सभागृहात सरनाईक यांनी सोमवारी विविध विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी या बैठकीत घोडबंदर रस्त्याचे काम वेगाने सुरू असून ते डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होईल, असा दावा केला. परंतु त्यांचा दावा महापालिका आयुक्तांनी खोडून काढला आहे. येथील महत्त्वाची कामे जरी डिसेंबर अखेर पूर्ण होणार असली तरी काही किरकोळ कामे शिल्लक राहणार असून ती कामे पूर्ण होण्यासाठी आणखी दोन महिन्यांचा कालावधी जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

घोडबंदर भागाची वाहतूककोंडी कमी होण्यासाठी सेवा रस्त्याचे मुख्य रस्त्यात विलीनीकरणाचे काम हाती घेण्यात असून हे काम कापुरबावडी ते गायमुखपर्यंत आहे. हे अंतर १०.५० किमीचे आहे. घोडबंदर मार्गावरील या रस्त्याचे पूर्णपणे काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. या कामासाठी ५६० कोटींचा खर्च केला जात आहे. या कामात २१९६ वृक्षांची तोडण्यात आले. विजेचे खांब व वीजवाहिन्या बदलण्यासाठी ७० कोटींचा खर्च येणार आहे.

दरम्यान, विविध कामामुळे घोडबंदर मार्गावर अनेक ठिकाणी बॉटल नेक झाल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी दिली. कोंडी सोडविण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या जात आहेत, याची माहिती त्यांनी दिली. तसेच येथील स्थानिक रहिवाशांनी घोडबंदरच्या समस्येवर तोडगा काढावा, अशी मागणी केली. घोडबंदर मार्गावरी कोंडी डिसेंबर नाही तर फेब्रुवारी २०२६ मध्येच फुटणार असल्याचे आयुक्तांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे.

पायाभूत सुविधांच्या कामांमुळे विलंब

कापुरबावडी ते गायमुख अशा पद्धतीने हे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी सेवा रस्त्याच्या एकच मार्गिका सुरू आहेत. काही ठिकाणी मेट्रोचे कामही सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे, तर रात्री ३ नंतर अवजड वाहनांची वाहतूक वाढून गायमुख घाट जाम होतो. ती कोंडी फोडण्यासाठी सकाळी ८ ते ९ वाजतात. त्यामुळे या भागात वाहतूककोंडी होत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

Maharashtra Budget 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून राज्याचा अर्थसंकल्प सादर; वाचा सर्व महत्त्वाच्या घोषणा एकाच क्लिकवर

क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर! पश्चिम रेल्वेकडून मुंबई-अहमदाबाद स्पेशल ट्रेन, जाणून घ्या वेळापत्रक

राज्याचा आर्थिक विकासदर वाढीचा वेग सर्वात कमी; ४ मोठ्या राज्य अर्थव्यवस्थांमध्ये महाराष्ट्र मागेच

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशातील सर्वात मोठी; राज्यावरील थकीत कर्जे GSDPच्या १८.३ टक्के

निर्यातदारांच्या डोक्यावर ‘अधिभारा’चा भार; प. आशियातील संघर्षाचा परिणाम, सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी