ठाणे : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठाणे शहरातील अनेक भागांत झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. गेल्या दोन दिवसात १०० हून अधिक झाडे ठाणे शहराच्या विविध भागात पडलेली आहेत.
ठाणे मनपाने या पडलेली झाडे किंवा त्यांच्या फांद्या अजूनही उचलेल्या नाहीत. त्यामुळे शहराच्या विविध भागात अस्वच्छता वाढली आहे. यंदाच्या पावसाळ्यात शहराच्या विविध भागात झाडे कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी महापालिकेने मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीतील अडथळे दूर केले असले, तरी उन्मळून पडलेल्या झाडांच्या फांद्या, पालापाचोळा आणि कचरा अद्याप रस्त्याच्या कडेला तसेच पदपथांवर पडून असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे परिसरात अस्वच्छता वाढली असून नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शहरातील विविध भागांमध्ये झाडांच्या मोठ्या फांद्या अद्याप हटविण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे पादचाऱ्यांना पदपथांचा वापर करता येत नसून काही ठिकाणी वाहनचालकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाच्या पाण्यासोबत पालापाचोळा गटारांमध्ये अडकल्याने पाण्याचा निचराही मंदावला आहे. पाऊस आणखी वाढल्यास या पडलेल्या झाडांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
विशेषतः निवासी परिसर, अंतर्गत रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी झाडांच्या फांद्या अनेक तासांपासून तसेच पडून असल्याने डासांची उत्पत्ती, दुर्गंधी आणि अस्वच्छतेची समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचा फटका नागरिकांना बसण्याची शक्यता आहे.
स्थानिक नागरिकांनी महापालिकेने केवळ वाहतूक सुरळीत करण्यापुरती कारवाई न करता संपूर्ण परिसराची युद्धपातळीवर साफसफाई करावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही दिवसही मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने प्रशासनाने झाडांच्या धोकादायक फांद्या तातडीने हटवून स्वच्छता मोहीम राबविण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.