प्रातिनिधिक छायाचित्र  
ठाणे

उल्हासनगरमध्ये अंतिम तारखेनंतरही ६४ नव्या नावांचा समावेश! मतदार यादीत संशयास्पद फेरफार; मनसे नेते सचिन कदमांचा गंभीर आरोप

मनसे नेते सचिन कदम यांनी गंभीर अनियमिततेचा आरोप करत राज्य निवडणूक आयोगाला थेट सवाल केला आहे. या उघडकीमुळे उल्हासनगरमधील निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Swapnil S

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत मतदार यादीत मोठा घोळ समोर आला असून, १ जुलै २०२५ ही अंतिम तारीख असतानाही त्यानंतर ६४ नव्या नावांचा समावेश झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भात मनसे नेते सचिन कदम यांनी गंभीर अनियमिततेचा आरोप करत राज्य निवडणूक आयोगाला थेट सवाल केला आहे. या उघडकीमुळे उल्हासनगरमधील निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला होता. त्यानुसार १ जुलै २०२५ पर्यंत असलेली मतदार यादीच निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात आली. मात्र, उल्हासनगर महापालिकेच्या यादीत या नियमाला हरताळ फासल्याचे चित्र समोर आले आहे. अलीकडेच आयोगाने सर्व २९ महापालिकांच्या प्रारूप मतदार याद्या जाहीर केल्या असून, त्यात उल्हासनगरची यादी प्रसिद्ध होताच मनसे नेत्यांनी तिचा सखोल अभ्यास केला.

कदम यांच्या म्हणण्यानुसार, १७ ते २१ नोव्हेंबर २०२५ या केवळ पाच दिवसांत ६४ नवी नावे मतदार यादीत समाविष्ट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. १७ नोव्हेंबरला दाखल झालेला अर्ज केवळ एका दिवसात पडताळणीसह मंजूर होऊन नाव यादीत समाविष्ट झाल्याचा आरोप त्यांनी केला. हे कारवाईचे संशयास्पद वेगवान स्वरूप असून, “नियम मोडून अंतिम तारखेनंतर नावे कशी काय समाविष्ट झाली? हा प्रकार नेमका कोणाच्या आदेशाने झाला?” असा सवाल कदम यांनी उपस्थित केला.

प्रभाग क्रमांक १३ मधील मतदार यादीची पाहणी करताना या सर्व ६४ नव्या नावांची नोंद स्पष्ट दिसून येत असल्याचं कदम यांनी नमूद केलं आहे. त्यामुळे हा प्रकार तांत्रिक चूक नसून गंभीर अनियमिततेचा भाग असण्याची शक्यता अधिक गडद झाली आहे. या प्रकरणामुळे मतदार यादीची विश्वासार्हता आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता धोक्यात आली असून, राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

मालमत्तेच्या मालकी हक्काबाबत निर्णय घेण्याचा अधिकार निबंधकांना नाही; उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्वाळा

Mumbai : राणीबागेतील बंगला उपमहापौरांना नाहीच; जलविभागाच्या अखत्यारीतील बंगल्याची आता चाचपणी

CJP Protest Delhi : जागा सोडू नका; मनोज जरांगे यांचा सल्ला

जेनेरिक औषधांवर २०० टक्के आयातकर- ट्रम्प; ऑगस्ट २०२८ नंतर होणार लागू, सर्वाधिक फटका भारताला

शिंदे चार दिवसांपासून दरे गावी, चर्चांना उधाण