ठाणे : ठाणे-पालघर विधान परिषद निवडणुकीचा सस्पेन्स वाढत चालला असून या निवडणुकीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मोठ्या राजकीय खेळीच्या तयारीत असल्याचे चित्र आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय खेळीमुळे विधान परिषदेचे राजकीय गणित आणखी रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. विरार, वसई, नालासोपारा आणि पालघर पट्ट्यात मजबूत पकड असलेल्या बहुजन विकास आघाडीचे (बविआ) नेते क्षितीज ठाकूर यांना या जागेवरून संधी मिळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
आगामी काळात पक्षाची ताकद अधिक वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील आहेत. त्याचाच भाग म्हणून बविआला थेट शिवसेनेत विलीन करण्यासाठी शिंदे गट प्रयत्न करत आहे. ठाकूर यांच्या 'बविआ'ची वसई-विरार आणि पालघर या भागात मोठी ताकद आहे.
शिवसेना आणि 'बविआ'चे समीकरण जुळले तर शिंदे सेनेचे माजी आमदार रवींद्र फाटक यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. फाटक हे स्वतः या जागेसाठी इच्छुक असून त्यांनी मतदारसंघाची मोर्चेबांधणीही सुरू केली आहे मात्र बदलत्या राजकीय खेळीमुळे त्यांची उमेदवारी धोक्यात येऊ शकते.
दरम्यान, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत क्षितीज ठाकूर यांचा भाजपने पराभव केला होता. या पराभवानंतर आता थेट विधान परिषदेच्या माध्यमातून क्षितीज ठाकूर यांना संधी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचे रणनीती शिंदे सेना तयार करत आहे.
बविआची ७१ मते महत्त्वाची
ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांची आकडेवारी पाहता, एकट्या भाजपकडे ४४४ मतांचे मोठे संख्याबळ आहे. त्याखालोखाल शिवसेनेकडे (शिंदे गट) ३४६ मते आहेत. या सांख्यिकीय समीकरणात भाजप सध्या शिवसेनेपेक्षा वरचढ ठरत आहे. त्यामुळे या जागेवर दावा मजबूत करण्यासाठी किंवा स्वतःचा उमेदवार निवडून आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अतिरिक्त मतांची जमवाजमव करणे आवश्यक आहे. बहुजन विकास आघाडीची (बविआ) ७१ मते किंग मेकर ठरणार आहेत.