

आजकाल फिटनेस, डाएट आणि वेट लॉस म्हटलं की सर्वात आधी आठवतात ती मोड आलेली कडधान्यं. सकाळचा नाश्ता असो किंवा डाएट चार्ट - 'स्प्राऊट्स हवंच' अशी अनेकांची ठाम धारणा आहे. पण एक महत्त्वाची बाब लक्षात घ्यायला हवी. मोड आलेली कडधान्यं जितकी पौष्टिक आहेत, तितकीच ती चुकीच्या पद्धतीने खाल्ली तर आरोग्याला घातक ठरू शकतात.
हरभरा, मूग, मटकी, चवळी यांसारखी कडधान्ये ही भारतीय आहाराची शान मानली जातात. मोड आल्यावर त्यांची पोषणक्षमता आणखी वाढते, पण योग्य सेवन हाच खरा मुद्दा आहे.
मोड आलेल्या कडधान्यांमध्ये काय असतं?
आहारतज्ज्ञांच्या मते, मोड आलेली कडधान्यं ही नैसर्गिक 'पावरहाऊस' आहेत.
यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात -
जीवनसत्त्वे A, B, C आणि E
कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम
फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स
यामुळे पचन सुधारतं, वजन नियंत्रणात राहतं आणि शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते.
मोड आलेली कडधान्यं खाण्याचे फायदे
पचनक्रिया सुधारते - फायबरमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी
वजन नियंत्रणात मदत - कमी कॅलरीज, जास्त पोषण
रोगप्रतिकारक शक्ती वाढते
कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहतं
त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर
पण 'ही' चूक करत असाल तर सावध रहा
फिटनेसच्या नादात अनेकजण मोड आलेली कडधान्यं पूर्णपणे कच्ची खातात. मात्र ही सवय आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
कच्च्या मोड आलेल्या कडधान्यांमध्ये जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते
पोटदुखी, गॅस, जुलाब किंवा संसर्गाचा धोका वाढतो
मोड आलेली कडधान्यं खाण्याची योग्य पद्धत
मोड आलेली कडधान्यं थोडीशी शिजवून घ्यावीत
मिठाच्या पाण्यात ५ मिनिटं उकळणं सुरक्षित मानलं जातं
किंवा थोड्या तेलात मीठ घालून हलकी परतून घ्यावी
फार जास्त शिजवू नका, नाहीतर पोषणमूल्य कमी होतात
योग्य प्रमाण, योग्य वेळ आणि योग्य पद्धत, हे तीन नियम पाळले, तर मोड आलेली कडधान्यं खरंच तुमच्या फिटनेसची गुरुकिल्ली ठरू शकतात.