

घरासमोरची तुळस हिरवीगार, टवटवीत आणि भरभरून वाढलेली असावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण उन्हाच्या झळा आणि बदलत्या हवामानाचा परिणाम तुळशीवरही दिसून येतो. त्यामुळे अनेकांच्या घरातील तुळशीची पानं गळू लागतात, रोप कोमेजून सुकल्यासारखं दिसू लागतं. अशावेळी रासायनिक खतं किंवा महागडी औषधं वापरण्याऐवजी कडुलिंबाच्या पानांपासून तयार होणारं घरगुती हिरवं पाणी तुळशीसाठी फायदेशीर ठरू शकतं. हा सोपा उपाय केल्यास सुकलेली तुळस पुन्हा हिरवीगार होण्यास आणि नव्या पालवीने बहरण्यास मदत होऊ शकते.
कडुलिंबाचं पाणी ठरेल फायदेशीर
तुळशीवर बुरशीजन्य किंवा जिवाणूजन्य संसर्ग झाल्यास तिची वाढ खुंटू शकते. अशावेळी कडुलिंबाच्या पानांचं पाणी उपयोगी ठरू शकतं. कडुलिंबामध्ये नैसर्गिकरित्या जंतूनाशक गुणधर्म असतात, त्यामुळे तुळशीचं आरोग्य सुधारण्यास मदत होते.
कसं तयार कराल हे हिरवं पाणी?
कडुलिंबाची १५ ते २० ताजी पानं स्वच्छ धुवून घ्या.
एका भांड्यात एक लिटर पाणी घेऊन त्यात ही पानं १२ ते १४ तास भिजत ठेवा.
त्यानंतर हे पाणी उकळून पूर्ण थंड होऊ द्या.
तयार झालेलं पाणी तुळशीच्या पानांवर शिंपडा.
थोडंसं पाणी कुंडीतील मातीतही घाला.
हा उपाय आठवड्यातून एक ते दोन वेळा केल्यास तुळशीवरील संसर्ग कमी होण्यास मदत होऊ शकते आणि रोप पुन्हा तजेलदार दिसू लागते.
तुळशीची चांगली वाढ होण्यासाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
१. पाण्याचं योग्य प्रमाण ठेवा
तुळशीला खूप जास्त किंवा खूप कमी पाणी देऊ नका. माती कोरडी वाटू लागल्यानंतरच पाणी घाला.
२. पुरेसं ऊन मिळणं गरजेचं
तुळशीच्या रोपाला दररोज किमान ४ ते ५ तास सूर्यप्रकाश मिळणं आवश्यक आहे.
३. माती भुसभुशीत ठेवा
कुंडीतील माती खूप घट्ट झाली असेल, तर मुळांना हवा मिळत नाही. त्यामुळे वाढ खुंटू शकते.
४. वरचा मातीचा थर हलका करा
महिन्यातून एकदा कुंडीतील वरचा मातीचा थर हलक्या हाताने उकरून घ्या. यामुळे मातीत हवा खेळती राहते आणि मुळांची वाढ चांगली होते.
(Disclaimer : या लेखातील माहिती ही सार्वजनिक स्रोत आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ‘नवशक्ति’ या माहितीची अचूकता किंवा परिणामकारकता याची हमी देत नाही.)