

४ फेब्रुवारीला जगभरात जागतिक कर्करोग दिन (World Cancer Day) साजरा केला जातो. कॅन्सरसारख्या गंभीर आजाराविषयी जनजागृती वाढवणे, वेळेवर निदानाचे महत्त्व अधोरेखित करणे आणि रुग्णांना मानसिक बळ देणे हा या दिवसामागचा मुख्य उद्देश आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे कॅन्सरचे प्रमाण वाढत असताना, योग्य वेळी लक्षणे ओळखणे आणि उपचार सुरू करणे अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे.
कॅन्सरसारखा गंभीर आणि जीवघेणा आजार वेळेत ओळखला गेला तर त्यावर उपचार करणे अधिक सोपे आणि परिणामकारक ठरू शकते. मात्र, अनेक रुग्णांमध्ये कॅन्सर झाल्याचे उशिरा समजते. यामागचं मुख्य कारण म्हणजे सुरुवातीची लक्षणे साधी वाटणे, वेदना नसणे किंवा आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष. त्यामुळे शरीराकडून मिळणाऱ्या काही सूचनांकडे वेळेत लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
तज्ज्ञांच्या मते, कोणताही विशेष आहार किंवा व्यायाम न करता अचानक वजन कमी होणे, सतत थकवा जाणवणे, शरीरात कुठेही विशेषतः स्तन, मान, काख किंवा अंडकोषात गाठ जाणवणे ही कॅन्सरची संभाव्य लक्षणे असू शकतात. याशिवाय तोंडात, त्वचेवर किंवा शरीराच्या इतर भागात जखम असून ती दीर्घकाळ भरून येत नसेल, तर तीही गंभीरपणे घेणे आवश्यक आहे. सतत खोकला येणे, आवाजात बदल होणे किंवा घसा दुखणे दोन ते तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
पचनसंस्थेशी संबंधित अचानक बदल, जसे की दीर्घकाळ बद्धकोष्ठता, अतिसार किंवा शौच करण्याच्या सवयींमध्ये बदल होणे, हीदेखील दुर्लक्षित करता येणारी लक्षणे नाहीत. कारण नसताना मूत्रातून, शौचेतून, खोकल्यातून रक्त जाणे किंवा महिलांमध्ये मासिक पाळीत अनियमित आणि जास्त रक्तस्राव होणे, ही कॅन्सरची चेतावणी असू शकते. त्वचेवरील तीळाचा रंग, आकार किंवा कडा बदलणे, नवीन तीळ निर्माण होणे, तसेच गिळताना त्रास होणे किंवा अन्न अडकत असल्यासारखं वाटणं हीही महत्त्वाची चिन्हे मानली जातात.
अनेक वेळा कॅन्सर झाल्याचे उशिरा समजण्याचं कारण म्हणजे ही लक्षणे सामान्य आजारांशी संबंधित वाटतात. वेदना नसल्यामुळे रुग्ण डॉक्टरांकडे जाणं टाळतात. नियमित आरोग्य तपासणीचा अभाव, कॅन्सरविषयी भीती, गैरसमज आणि काही भागांमध्ये वैद्यकीय सुविधांची कमतरता हीदेखील कारणे आहेत. त्यामुळे लक्षणे दिसूनही वेळ न दवडता तपासणी केली जात नाही.
जागतिक कॅन्सर दिनानिमित्त तज्ज्ञांचा सल्ला असा आहे की शरीरात होणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष करू नये. कोणतीही लक्षणे दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकत असतील तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नियमित हेल्थ चेकअप करणे, तंबाखू व धूम्रपानापासून दूर राहणे आणि कॅन्सरविषयी योग्य माहिती समाजात पसरवणे हेच कॅन्सरविरुद्धचे सर्वात प्रभावी शस्त्र आहे.
(Disclaimer: या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)