

धावपळीच्या जीवनशैलीत अनेकजण आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र वयाची तिशी ओलांडल्यानंतर शरीरात हळूहळू बदल होऊ लागतात आणि अनेक आजारांची शक्यता वाढते. त्यामुळेच, वेळेवर आरोग्य तपासणी करणे अत्यंत गरजेचे ठरते. 'वर्ल्ड हेल्थ डे'च्या निमित्ताने डॉक्टरांकडूनही नियमित वैद्यकीय चाचण्यांचे महत्त्व अधोरेखित केले जात आहे.
तिशीनंतर कोणत्या तपासण्या महत्त्वाच्या?
वयाच्या तिशीनंतर मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल यांसारख्या आजारांची शक्यता वाढते. त्यामुळे दरवर्षी ब्लड शुगर, लिपिड प्रोफाइल आणि ब्लड प्रेशरची तपासणी करणे आवश्यक आहे. याशिवाय, थायरॉईड चाचणी आणि लिव्हर-किडनी फंक्शन टेस्ट केल्याने शरीरातील बदल लवकर ओळखता येतात. नियमित तपासण्यांमुळे आजाराचे सुरुवातीच्या टप्प्यातच निदान होऊन योग्य उपचार घेता येतात.
महिला-पुरुषांसाठी वेगळ्या चाचण्या आवश्यक
महिलांनी स्तन तपासणी, पॅप स्मिअर आणि हाडांची घनता (बोन डेन्सिटी) चाचणी वेळोवेळी करणे महत्त्वाचे आहे. तर, पुरुषांनी हृदयविकाराशी संबंधित तपासण्या, ईसीजी आणि प्रोस्टेट चाचणी (वयानुसार) करून घ्यावी. याशिवाय दोघांनीही डोळे, दात आणि वजन नियंत्रणावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. योग्य वेळी तपासणी केल्यास भविष्यातील गंभीर आजारांपासून बचाव करणे शक्य होते.
त्यामुळे 'वर्ल्ड हेल्थ डे'च्या निमित्ताने एक गोष्ट लक्षात ठेवा, आरोग्य तपासणी म्हणजे खर्च नसून गुंतवणूक आहे. वेळेवर केलेली छोटी चाचणी भविष्यात मोठ्या आजारांपासून तुमचे रक्षण करू शकते.
(Disclaimer: यामध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)