

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेसची युती झाल्याची चर्चा जोर धरत आहे. या युतीच्या चर्चेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बुधवारी (दि.७) एका वृत्तवाहिनीशी बोलताना फडणवीस यांनी ही युती पूर्णपणे चुकीची असल्याचे सांगितले.
हे खपवून घेतले जाणार नाही...
शिवसेना शिंदे गटाला बाजूला सारून अंबरनाथ नगरपरिषदेत भाजप आणि काँग्रेस अशी हातमिळवणी झाल्याच्या चर्चेवर फडणवीस म्हणाले, “काँग्रेससोबत कोणत्याही स्वरूपात युती करणे चुकीचे आहे. अंबरनाथमध्ये असे काही घडले असेल, तर ते होता कामा नये. याबाबत मी माझ्या कार्यकर्त्यांना जाब विचारणार आहे. हे खपवून घेतले जाणार नाही” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
काँग्रेससोबत युती केली असेल तर...
फडणवीस यांनी सांगितले की, "अंबरनाथमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात चर्चा सुरू होती. मात्र, स्थानिक पातळीवर भाजपच्या काही नेत्यांनी काँग्रेससोबत युती केली असेल तर ती पक्षाच्या भूमिकेला धरून नाही, हे चुकीचं आहे, हा शिस्तभंग आहे, यावर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपच्या 'काँग्रेसमुक्त भारत' घोषणेला छेद
दरम्यान, अशाच प्रकारची युती भाजपने अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपरिषदेत एआयएमआयएम आणि इतर पक्षांसोबत केल्याचे वृत्त समोर आले आहे. यावरूनही भाजपवर टीकेची झोड उठली आहे. शिवसेना शिंदे गटाने या युतीवर तीव्र टीका करत याला 'अनैतिक आणि संधीसाधू राजकारण' असे संबोधले. शिवसेना आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी ही कृती युती धर्माचा भंग असून ही अभद्र युती भाजपच्या 'काँग्रेसमुक्त भारत' या घोषणेला छेद देणारी असल्याचे म्हटले.
अंबरनाथ विकास आघाडीची स्थापना; नगरसेवकांचे निलंबन
डिसेंबरमध्ये झालेल्या ६० सदस्यांच्या अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला २७ जागा मिळाल्या होत्या, भाजपला १४, काँग्रेसला १२, राष्ट्रवादीला ४, तर २ अपक्ष निवडून आले होते. एका अपक्षाच्या पाठिंब्याने भाजप-काँग्रेस-शिवसेना शिंदे गट या युतीची संख्या ३२ वर पोहोचली असून बहुमताचा आकडा ओलांडण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अंबरनाथ नगरपालिकेवर भाजपने आपला नगराध्यक्ष बसवला. त्यानंतर सर्वाधिक २७ नगरसेवक असलेल्या शिवसेना शिंदे गटाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने काँग्रेस व राष्ट्रवादी अजित पवार गट या पक्षांसोबत हातमिळवणी करत ‘अंबरनाथ विकास आघाडी’ स्थापन केली. अशातच, अंबरनाथ नगरपालिकेला भ्रष्टाचार आणि भयमुक्त करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा दावा भाजपने केला. यानंतर भाजप आणि काँग्रेसच्या युतीवर मुख्यमंत्र्यांसह सर्वच स्तरांतून टीका झाली. यामुळे काँग्रेसने त्या नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई केल