

मुंबई : मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा कायम असताना बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) नागरिकांना आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे लेप्टोस्पायरोसिस या जीवाणूजन्य आजाराचा धोका वाढत असल्याने नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, तसेच ताप, डोळे लाल होणे, अंगदुखी किंवा कावीळ यांसारखी लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत, असा सल्ला महापालिकेने दिला आहे.
भरतीच्या काळात सतर्क राहण्याचे आवाहन
महापालिकेने विशेषतः सखल आणि किनारपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांना भरतीच्या वेळेत अधिक सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. मुसळधार पाऊस आणि भरती एकाच वेळी आल्यास पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होऊन पाणी साचण्याचा धोका वाढू शकतो.
लेप्टोस्पायरोसिसचा धोका वाढला
शहरातील अनेक भागांत पाणी साचल्याने लेप्टोस्पायरोसिसचा धोका वाढल्याचा इशारा महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिला आहे. उंदीर, गुरे आणि कुत्रे यांसारख्या संक्रमित प्राण्यांच्या लघवीतील जीवाणूंमुळे हा आजार होतो. हे दूषित पाणी किंवा माती शरीरावरील जखमांशी संपर्कात आल्यास संसर्ग होऊ शकतो.
'ही' लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांकडे जा
ताप
डोळे लाल होणे
कावीळ
पाणी साचलेल्या भागातून गेल्यानंतर अंगदुखी किंवा फ्लूसारखी लक्षणे
नागरिकांनी जवळच्या महापालिका रुग्णालय, दवाखाना किंवा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे मोफत तपासणी करून आवश्यक असल्यास प्रतिबंधात्मक उपचार घ्यावेत, असेही सांगण्यात आले आहे.
औषधांचा पूर्ण कोर्स करा
डॉक्टरांनी दिलेली औषधे मध्येच बंद न करता संपूर्ण उपचार पूर्ण करण्याचा सल्लाही आरोग्य विभागाने दिला आहे.
नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना
शक्यतो साचलेल्या किंवा पूराच्या पाण्यातून चालणे टाळा.
पाण्यात जाणे अपरिहार्य असल्यास रबरचे बूट किंवा वॉटरप्रूफ पादत्राणे वापरा.
शरीरावरील जखमा स्वच्छ करून झाकून ठेवा.
दूषित पाण्याच्या संपर्कात आल्यास प्रतिबंधात्मक उपचार घ्या.
ताप किंवा इतर लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार पूर्ण करा.
प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
मुंबईत पुढील २४ तास अतिमुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि भरतीचा अंदाज असल्याने नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, हवामान विभाग आणि महापालिकेच्या अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवावे तसेच आरोग्यविषयक सर्व खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.