

भिवंडी : कोहिनूर अपार्टमेंट दुर्घटनेनंतर भिवंडी-निजामपूर महापालिकेने शहरातील धोकादायक इमारतींबाबत मोठा निर्णय घेतला आहे. महापौर नारायण चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आपत्ती व्यवस्थापन बैठकीत अतिधोकादायक इमारती तातडीने रिकाम्या करण्याचे, तसेच अशा इमारतींचा वीज आणि पाणीपुरवठा बंद करण्याचे आदेश देण्यात आले.
महापौरांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक
कोहिनूर अपार्टमेंट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापनाचा उच्चस्तरीय आढावा घेतला. महापौर नारायण चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
शहरातील २३८ इमारती अतिधोकादायक
बैठकीत महापालिका अधिकाऱ्यांनी शहरातील धोकादायक इमारतींची माहिती सादर केली. त्यानुसार शहरात सी-१ (अतिधोकादायक) श्रेणीतील २३८ इमारती असून, सी-२ए श्रेणीतील ८३६ इमारतींनाही तातडीच्या उपाययोजनांची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले. यावर महापौरांनी सी-१ श्रेणीतील सर्व इमारती तातडीने रिकाम्या करण्याचे आदेश दिले.
वीज आणि पाणीपुरवठा बंद करण्याच्या सूचना
धोकादायक इमारतींमध्ये नागरिक पुन्हा राहू नयेत, यासाठी अशा इमारतींचा वीज आणि पाणीपुरवठा तात्काळ बंद करण्याच्या सूचना महापौरांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच इमारतींच्या संरचनात्मक तपासणीचा पंचनामा इमारत मालक आणि रहिवाशांना उपलब्ध करून देण्याचेही निर्देश देण्यात आले.
स्थलांतरित नागरिकांसाठी तात्पुरती व्यवस्था
धोकादायक इमारती रिकाम्या करताना स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबांची गैरसोय होऊ नये, यासाठी महापालिकेच्या इमारतींमध्ये त्यांच्यासाठी तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
महापालिकेकडून अशा नागरिकांना पाच ते सहा दिवस निवारा आणि अन्नाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.